http://dinanathmangeshakar.blogspot.in



ऋणनिर्देश
     आपण केलेले कार्य पूर्ण करण्यासाठी हजारो लोकांच्या  मदतीचे हात त्या कार्यास लागलेले असतात आणि आपण केवळ एक माध्यम असतो; ते कार्यपूर्ण करणारे असे माझे मत आहे. प्रत्येक चांगल्या कार्याच्या पाठीशी अनेकांचे प्रोत्साहन व  सहकार्य मिळालेले असते. प्रबंधाच्या लेखणासाठी विषय निवडणे, त्यासाठी आवश्यक ते संदर्भ साहित्य गोळा करणे, त्याची योग्य पद्धतीने रचना करणे, या सारख्या अनेक गोष्टी मला या प्रबंध लेखणाच्या निमित्ताने शिकता आल्या. एम.ए. पदवी परीक्षेसाठी सादर केलेल्या शोध निबंधात मला अनेक आदरणीय व्यक्तिकडून जे सहकार्य, प्रोत्साहन मिळाले त्याबदल मी त्यांची शतश: ऋणी आहे.
     माझ्या मार्गदर्शिका डॉ. ईला वेद मॅडम (प्राध्यापिका) आणि इतिहास प्रमुख एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ मुंबई, यांनी आपल्या जबाबदारीचे काम सांभाळून आत्मियतेने व प्रेमाने वेळोवेळी मला मार्गदर्शन केले. त्यांच्या बहुमोल मार्गदर्शनाशिवाय हा शोधनिबंध पूर्ण होणे अवघड होते. त्यामुळे मी संशोधिका त्यांची मनपूर्वक अत्यंत ऋणी आहे. मला माझ्या महाविद्यालयातील प्राचार्या श्रीमती स्मृती भोसले मॅडमनी केलेल्या सहकार्याबद्दल मी त्यांची आभारी आहे.
     मला वेळोवेळी संशोधन कार्य पूर्ण करण्यास व मला ग्रंथ आणि संदर्भग्रंथ पुरविणार्‍या एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबई येथील कर्मचारी वर्ग व मुंबई मराठी ग्रंथालय दादर, मुंबई विभागातील कर्मचारी वर्गची मी ऋणी आहे आणि त्यांनी केलेल्या सहकार्याबदल मी मन:पूर्वक धन्यवाद देते.
     सर्वात महत्त्वपूर्ण अशा माझ्या कुंटुंबिया कडून मला जो प्रोत्साहन व प्रेरणा मिळाली त्यामध्ये उल्लेखनीय कार्य माझ्या वाहिनीने म्हणजे सौ. धनश्री गायकवाड यांनी सहकार्य केले आहे. त्यामुळेच हा प्रबंध पूर्ण होऊ शकला. म्हणून मी माझ्या कुंटुंबियांचे आणि माझ्या मित्रमैत्रिणीची नेहमी ऋणी राहीन.
     संशोधिका

कुमारी सुचिता गोपाळ गायकवाड





मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचे महाराष्ट्रातीलनाट्यसंगीत
कार्यातील योगदान








अनु.क्र.
अनुक्रमणिका
पान क्र.
1.   
१. प्रमाणपत्र

2.   
२.  ऋणनिर्देश

3.   
३. विषय

4.   
४. प्रस्तावना

5.   
५. प्रकरण

6.   
५.१ 20व्या शतकात महाराष्ट्रातील संगीत नाट्यसंकृतीचा परिचय:-

7.   
५.२ मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा जीवन परिचयमा. दीनानाथ मंगेशकर यांचे बालपण

8.   
५.३ दीनानाथाची नाटक क्षेत्रातील कामगिरी

9.   
५.४ संगीत क्षेत्रातील कामगिरी : दीनानाथांचे संगीत क्षेत्रातील पदार्पण

10.           
५.५मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचे उत्तराधिकारी

11.           
६. निष्कर्ष

12.           
७. परिशिष्ट

13.           
८. संदर्भ सूची

            
९. छायाचित्रांची यादी






क्र.
ध्वनिमुद्रिका क्र.
गीताचे बोल
नाटक / राग
नाटककार/ कवी
1.   
पी १३३५६
परवशता पाश दैवे
शांत दांत कालिकाही 
रणदुदुभि(कवाली) रामराज्य वियोग (विरह) 
वीर वामनराव जोशी
2.   
पी १३३५७
नन्नू द्रोवणी
दिव्य स्वातंत्र्य रवि
(अध्धा, तेलगू )
रणदुदुभि(मालकंस)
वीर वामनराव जोशी
3.   
पी १३३७०
चराचरी हा तुझा

शंकर भंडारी बोले
भावबंधन (विहाग ठुंबरी)
शंकरा (एक्का )
रा.ग. गडकरी

कवी श्री.कृ. कोल्हटकर
4.   
पी १३३८६
वदनी धर्म जलाला

भासे जनात राया
सौभद्र( सिंधुरा )

राजसंन्यास (कवाली)
अण्णासाहेब किर्लोस्कर
रा.ग.गडकरी
5.   
पी १३४४२
शुरा मी वंदिले

रवि मी, हा चंद्र कसा
मानापमान

मानापमान
काकासाहेब खांडिलकर
काकासाहेब खांडिलकर
6.   
पी १३४५२
कठीण कठीण कठीण किती
नैन सो नैन मिला 
भावबंधन (यमन)

दरबारी
रा.ग.गडकरी

रा.ग.गडकरी
7.   
पी १३४५२
जिंकले जगी ते
प्रेम सेवा शरण
रणदुदुभि( गजल)
मानापमान
वी. वा. जोशी
वी. वा. जोशी
8.   
पी १३४९८
भाव भला भजकाचा

आजवरी पाहूनि जीवलगा
उग्र मंगल (देसी आसावरी )
राजसंन्यास(लावणी)
वासुदेव शास्त्री खरे
रा.ग.गडकरी


9.   
पी १३५१६
नाचत नागगनात नाथा
सहेली मन दारुडा
पुण्यप्रभाव(कवाली)

पहाडी ताल-दादरा
रा.ग.गडकरी

रा.ग.गडकरी
10.      
पी १३५१६
सुखी साधना मना


साजणी बाई
देशकंठक / देसकार

(त्रिताल )
राजसंन्यास(कवाली)
वासुदेव शास्त्री खरे
रा.बा. शास्त्री
रा.ग.गडकर
11.      
पी १३५१६
नोहे सुखमया (यमन)

तारी बिघेला वामनवा
उग्र मंगल

उग्र मंगल
वासुदेव शास्त्री खरे
वासुदेव शास्त्री खरे


क्र.
ध्वनिमुद्रिका क्र.
गीताचे बोल
नाटक / राग
नाटककार/ कवी
1)   
एन ४११७
समयी सखा प्रिया घेउनी जाता
संन्यास्त खडग
संन्यास्त खडग
वी.दा.सावरकर वी.दा.सावरकर
2)   
एन ४११७३४
चंद्रिका ही जणू
भाली चंद्र असे धरीला
मानापमान
मानापमान
काकासाहेब खंडीलकर -!!-
3)   
एन ४१५४
नसे जित पहा
सुकतातचि जगीया
संन्यास खडग
भैरवी
वी.दा.सावरकर
वी.दा.सावरकर
4)   
एन ४१७५
वितरी प्रखर
काही नाही पाही जनी मोल
तिलक कमोद
रंनदुदुभि
वी. वा. जोशी

5)   
एन ५०११
शत जन्म शोधताना
मर्म बंधातील ठेव ही
भैरवी गझल कवाली
धनाश्री त्रिकाल 
संन्यास्त खडग
वी.दा.सावरकर
श.बा. जोशी
6)   
एन ५००७
रतीरंग रंगे (कवाली झपताल)
आपदा राजपदा 
संन्यास खडग
रंनदुदुभि

वी.दा.सावरकर
वी. वा. जोशी
7)   
एन ५००९
जगीया खास (कवाली)
पतिव्रता ललना होती (कवाली )
रणदुदुभि( गजल)
चौदावे रत्न
वी. वा. जोशी
अच्युत कोल्हटकर
8)   
एन ५०१२
रंग अहा भरला
माझी मातुल कन्यका
पुण्यप्रभाव
सौभद्र
रा.ग.गडकरी अण्णासाहेब किर्लोस्कर
क्र.
ध्वनिमुद्रिका क्र.
गीताचे बोल
नाटक / राग
नाटककार/ कवी

एफ टी २२७७
सकल गडचंदा
प्रबला बलहता
जयजयंती
देशकंठक
     ____
वासुदेवशास्त्री खरे,श.बा.शास्त्री

एफ टी २३५१
हो परी मुराता
निके निके शोभा
सिंधुरा
बहादुरी तोडी
     ___
     ___
क्र.
ध्वनिमुद्रिका क्रमांक.
गीताचे बोल
नाटक/ राग
नाटककार/ कवी
1.   
एम.एम.७११९
तन जहाले मनसागर
अबरुत भर आई
जयजयंती
वसंत
     __
     __
2.   
एम.एम.७१३४
सुर सुख खनितू
युवती मना
विद्याहरण
मानापमान
काकासाहेब खांडिलकर
काकासाहेब खांडिलकर
3.   
एम.एम.७१४०
मधुमिलनात या
सुहास्य तुझे मनासीमोही राग – बडहंस
ब्रम्हकुमारी
कृष्णर्जुन युध्द-बोलपट
श्री मेश्राम बेडेकर
4.   
डी.ए.६८५८
झूता मुरारे
परलोक साधनवे
कानडी
कानडी
     __
     __






मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचे महाराष्ट्रातील नाट्यसंगीत कार्यातील योगदान:-

प्रस्तावना
आज महाराष्ट्रात आणि मुंबई मध्ये नाटक, रंगभूमी यांची ओळख वेगळीच आहे. त्यातही नाट्य व संगीत हे दोन्ही एकत्रितरित्या करणे खूपच अवघड आहे. पूर्वी नाट्य संगीताची खूप मोठी लाटच आलेली होती. त्यातून समाजात घडणार्‍या घटनांचा इतिहास ही त्यातून दाखवला जाई. आताही समाजात घडणार्‍याघटना आणि इतिहास याचा परिचय करून देणारी लोककला, नाटक पहायला मिळतात. परंतू नाटकापेक्षा चित्रपटाकडे आजची तरुणाई जास्त जाताना दिसते. तरी आजही नाट्यसृष्टीची आणि नाट्यसंगीताची परंपरा अजूनही चालूच आहे.
    मराठी नाटकांची परंपरा ज्ञानेश्वरांच्या काळापासून चालत आलेली आहे. असे इतिहाचार्य राजवाडे यांचा दावा आहे.
    नाटकाचा विचार करता नाटक ही कला येण्यापूर्वी पासूनच लोक परंपरा दिसून येते. लोकरंगभूमीची पारंपरिकता व अपौरुषेयता ही दोन वैशिष्ट्ये जगभरच्यागभूमीवर दिसतील. भारतातील लोकरंगभूमी ही अतिप्राचीन आहे. महाराष्ट्रात तमाशा, कोकणात दशावतार, खेळे, गोव्यात जागर,धालो,काला गुजरातेत भवाई, बंगालमध्ये जात्रा, राजस्थानात ख्याल,कर्नाटकातील यक्षगान, अशा लोकनाट्य विद्या त्या त्या प्रदेशात प्रचलित आहेत. ग्रामीण भागात त्यांचे खेळ आजही होत आहेत.
     एकुण पाहता महाराष्ट्रातील तमाशात धर्मश्रद्धाविरहित प्रयोगात जसे हे कलाकराचे उत्स्फूर्त वत्कृत्व पणाला लावून प्रयोग रंगतो हे वैशिष्ट्य दिसते. तसेच वाघ्या  मुरळीच्या जगरणात सारख्या प्रयोगातही दिसते. तसेच कीर्तन दशावतार अशा लोक ही ग्रामीण भागात पाहायला  मिळतात. एकूण लोकरंगभूमीच्या संदर्भात महाराष्ट्रातील लोकरंगभूमीचा विचार करता तिची परंपरापरा अत्यंत समृध्द आहे. त्याचे एक कारण म्हणजे महाराष्ट्राचे  भारतातील भौगोलिक मध्यवर्ती स्थान उत्तर दक्षिणेच्या मध्यावर महाराष्ट्र आहे. भाषिक दृष्ट्या उत्तरेच्या आर्यादभव भाषा व दक्षिणेच्या द्रवीडवंशीय भाषा यांच्या मध्यावर आहे. त्यामुळे उत्तरेकडील राम कृष्णादि अवतारोत्तर भागवत भक्तिसंप्रदाय आणि दक्षिणेतील द्रविड संस्कृतीतील यक्षरक्ष संस्कृतीच्या प्रभावाखाली शिवभक्तिसंप्रदाय या सर्वाचेच संमेलन महाराष्ट्रातील लोककलांमधून दिसते. अशा प्रकारे शिवाचा अवतार मानल्या गेलेल्या खंडोबाचे उपासक असलेल्या वाघ्या मुरळीचे जागरण,भागवत सांप्रदायिक रामकृष्णादि दशावतारांचे गुणगान करणारे दशावतार खेळ किंवा भागवत खेळ, अंबाबाई उदोकार करणारे नृत्ये आणि  गोंधळी असे नाट्यप्रकार पूर्वीपासूनच महाराष्ट्रात चालूच आहेत. अशा प्रकारे या लोककला समाजाचे रंजन करीत होत्या. त्यानंतर विष्णुदास भावे यांच्या सीता स्वयंवर या नाटकापासून नाट्यसंगीताची परंपरा निर्माण झाली व अखंड राखली गेली. अनेक नाटकमंडळी निर्माण झाली. यामध्ये किर्लोस्कर संगीत मंडळी प्रमुख होती. त्याच प्रमाणे बळवंत संगीत मंडळीही होती.
     या पुस्तकात आपल्याला मास्टर दीनानाथ मंगेशकर यांनी महाराष्ट्रात नाट्यसंगीतात कशा प्रकारे योगदान दिले याचा आढावा घ्यायचा आहे.  
     मास्टर दीनानाथ मंगेशकर हे खूप श्रेष्ठ व्यक्तिमत्व होते त्यांनी संगीत नाटकात खूप मोलाचे काम केले भावबंध हे रामगणेश गडकरी यांनी लिहिलेले संगीत नाटक यात त्यांनी लतिकेची भूमिका केली. तसेच पुण्यप्रभाव मधील दीनानाथाची गाणी गाजली किंकिणीची भूमिका व गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत. संगीत मानापमान मध्ये धैर्यधराची भूमिका अशा भूमिका तसेच गायनाची स्वतंत्र शैली निर्माण केली.उग्रमंगल या नाटकातील खटकेबाज गझलच्या धर्तीवर नवीन चाली. गायनातील वैशिष्ट्ये पाहता स्वरफेक व स्वरलगाव, अत्यंत सहजता, आक्रमकता विविध स्वरअलंकार, गायनशैलीतला समतोल ही गायनाची वैशिष्ट्ये दिसून येतात. कुशाग्रबुध्दी, एखादे गाणे किंवा पद ऐकल्यावर तल्लखतेने पुन्हा म्हणणे आणि त्यातील पदामधील तान, चाल, यात बदल करून पुन्हा म्हणून दाखवणे ही त्यांच्या गुणांची वैशिष्ट्ये होती. 
     असा नट आणि गायक महाराष्ट्राला लाभला. 


प्रकरण -१

20व्या शतकात महाराष्ट्रातील संगीत नाट्यसंकृतीचा परिचय:-
१.    मराठी नाटकांचा इतिहास:-
नाटकांचा इतिहास पाहता फार पूर्वी पासून लोक रंगभूमिची  परंपरा अस्तित्वात होती. बाराव्या  शतकानंतरच्या भक्तिसंप्रदायाच्या प्रभावकाळात संतांनी त्यांच्या आधी पासून समाजात विद्यमान असलेल्या लोकनाट्य प्रकारांचा उपयोग आपल्या विचारांच्या प्रचारासाठी करून घेतला असल्याचे दिसते. गोंधळ, डवरी, भुत्ये, सौरी गवळन हे गीतप्रकार व नाट्यप्रकार, तत्पूर्वकाळात होतेच. मध्ययुगाच्या काळात आणि भक्तिसंप्रदायांच्या वेळी प्रचार करण्यासाठी समकालीन प्रतिभावंतांनी या कलाप्रकारांचा उपयोग करून घेतलेला दिसतो.१
     लक्ष्मीनारायण कल्याण या नाटकाच्या दीडशे वर्षात तमाशे, दशावतारी असे, लोकनाट्य समाजात होते.पण नाटकाचा असा पहिला प्रयोग कै. विष्णुदास भावे यांनी १८४३ साली सांगली येथे करून मराठी रंगभूमीची प्राणप्रतिष्ठा केली. त्यांच्या सीता स्वयंवर या आख्यानवजा संगीत पौराणिक नाटकापासून सुरुवात करावी लागते. याचे प्रमुख कारण असे कि या नाटकापासून मराठी रंगभूमीची आणि मराठी नाट्यसंगीताची अखंड परंपरा निर्माण होऊन ती आजतागायत राखली गेली आहे. १८४३ पूर्वी मराठी संगीत नाटकाचे उल्लेख उपलब्ध नाहीत असा त्याचा अर्थ करता येणार नाही कारण १६९० पासून सादर केले गेलेली तंजावरची संगीत नाटके आणि १८१८ नंतर सादर केलेली गोमंतकालीय संगीत नाटके उपलब्ध आहेत. तथापि या नाटकांना परंपरेचे सातत्य नाही. याउलट १८४३ पासून पुढे मराठी रंगभूमिला आणि मराठी नाट्यसंगीताला सलग परंपरा लाभली आहे.२
     १८४३पासून विष्णुदास भावे यांच्या युगातील नाटके संगीताने नटलेली होती. परंतु त्या आधी १८८० मध्ये अण्णासाहेब किर्लोस्करांचे शाकुंतल हे नाटक आले. या संगीत नाटकाच्या श्रवणानेच लोकांना नवे संगीत नाटकाचे युग आल्यासारखे वाटले.३
     १८८० पासून आजपर्यंतच्या म्हणजे १०० वर्षाच्या काळाचे नाट्य-संगीताच्या दृष्टीने स्थल मानाने नाट्यशोध या पुस्तकात चार टप्पे सांगितले आहेत.
१.    पहिला:- किर्लोस्कर, देवल,कोल्हटकर,यांच्या नाटकाचा काळ (इ.स.१८८० ते १९३५)
२.    दूसरा:- मानापमान नाटकापासूनचा, रंगभूमीचा काळ यामध्ये खाडिलकर, वरेरकर, गडकरी, खरेशास्त्री, वीर वामनराव जोशी, देसाई, टिपणीस यांच्या नाटकांचा काळ (१९११ ते १९३५)
३.    तिसरा:- आपकर्षाचा प्रहार पचवून पुन्हा मराठी रंगभूमीला उत्कर्षाकडे नेहण्याचा प्रयत्न करणार्‍या कलावंताचा म्हणजे बालमोहन, नाट्यानिकेतन,कला विकास, राजाराम प्रभाकर इत्यादी नाट्य संस्थाचा काळ इ.स.(१९३५ ते १९५५)
४.    चौथा:- मराठी रंगभूमि निश्चितपणे पुन्हा उर्जितावस्त येत आहे. अशा विश्वासाने नवनवीन प्रयोग करणार्‍या कलावंताचा काळ इ.स. १९५५ पासून ते आजपर्यंत.४
२.   नाटकाची वाढ व विकास:-
          इ.स.१९४३ हा साल नाटकाच्या दृष्टीने महत्वाचा मानला जातो. विष्णुदास भावेयांनी मराठी समाजास संगीत नाटक हे करमणुकीचे साधन म्हणून उपलब्ध करून दिले. म्हणून विष्णुदास भावे यांना संगीत नाटकाचे जनक मानले जाते.
     भावे यांच्या सीतास्वयंवर या नाटकातील संगीताचे स्वरूप सांगीतिक दृष्ट्या कीर्तनाच्या गायकीच्या स्वरुपात होते. कारण या नाटकात सुत्रधार संगीत प्रस्तुत करीत असे. भावेकालीन पौराणिक नाटकांतील बहुसंख्य पदावर रागांचा नामनिर्देश आढळतो. शिवाय वृत्त-छंदात्मक पद रचनेचाही समावेश या नाटकातून होतो. या पदांच्या गायनाचे स्वरूप किर्तनकारांच्या   गायना सारखे होते. शास्त्रीय संगीताचे आज जे स्वरूप आपल्या समोर आहे. त्या सारखे नसले, तरी ते परिष्कृत स्वरूपाचे संगीत होते. त्यानंतर किर्लोस्कर युग आले. ५
किर्लोस्कर आणि देवल युग:-
     ३१ मार्च १८४३ साली अण्णासाहेबांचा जन्म झाला आणि यावर्षीच विष्णुदास भावे यांनी आपल्या सीतास्वयंवर नाटकाचं पहिला प्रयोग करून मराठी रंगभूमीची प्राण प्रतिष्ठा केली होती. १८६३ साली ते पुण्यात  आले. “ज्युनिअर फर्स्ट” पर्यंतचे शिक्षण त्यांनी पुण्यात केले, असे असले तरी अभ्यासक्रमातील विषयापेक्षा नाटक आणि संगीत या विषयाकडे त्यांचा जास्त ओढा होता. अण्णासाहेबातला नाटककार जागृत होण्यापूर्वी त्यांच्यातला कवी जागृत झाला होता, असे म्हणता येईल. पुण्यातील मुक्कामात अण्णासाहेबांनी अनेक नाटके पहिली आणि भावे यांच्या संप्रदायातील काही पौराणिकनाटकांसाठी गीतरचना केली. १८६४ ते १८६६ या काळात अण्णासाहेबांनी स्वत:चा नटसंच जमविला, आणि निर्मात्याची भूमिका पत्करून काही पौराणिक नाटकांचे प्रयोग प्रेक्षकांना सादर केले.६
     बेळगावात स्थानिक झाल्यापासून अण्णासाहेबांचा नाटकाचा नाद वाढतच गेला. पारिजात नावाच्या कन्नड नाटकाला अण्णासाहेबांनी संगीताची जोड दिली. त्यांचा प्रयोग सांगलीकर नाटक-मंडळी करीत असे. १८६३ ते १८७९ पर्यंत पौराणिक नाटकांसाठी अण्णासाहेबांनी एकंदर चोवीस आख्याने रचिली. संस्कृत नाटकाचाही अभ्यास केला आणि त्यातील रसिकता अण्णासाहेबांनी आत्मसाद केली.७
     अण्णासाहेब बेलगावला असताना अँग्लो व्हरनॅक्यु शाळेत गोविंदा नावाचा विद्यार्थी होता त्यालाही कविता करण्याचा नाद होता. नाटक लिहिणे, नाटकासाठी गीतरचना करणे, नाटक बसविणे आणि नटांना अभिनय शिक्षण देणे अशा गोष्टीची माहिती गोविंदला अण्णासाहेबांच्या सहवासात झाली, आणि गोविंदा म्हणजेच गोविंद बल्लाळ देवल होय.८
     अण्णासाहेब पुण्यात आले तेव्हा पूर्णांनंद नाटकगृह दादाभाई सोरोजी पटेल यांच्या 'इंद्रसभा' मामक फारशी नाटकाचा प्रयोग चालू होता तो त्यांनी पाहिला यामध्ये त्यांना निराळाच संगीताचा प्रकार पाहायला मिळाला. यामध्ये ज्या प्रत्रांच्या भावना पदात व्यक्त केल्या असतील , तेच पात्र तेच पद म्हणत होते. यातूनच महाकवी कालिदासाच्या 'शांकुंतल'नाटकाचे रूपातर करावे असे त्यांनी ठरविले.९
अण्णासाहेबांनी संस्कृतचा सखोल अभ्यास केला होता. संगीताचे ज्ञान होते. लोकगीत, भक्तीगीत, लावण्या, आणि हिंदुस्तानी व कर्नाटकी, खानदानी संगीत अशा निरनिराळ्या गायन प्रकारातील चाली त्यांना अवगत होत्या. त्यानंतर प्रमुख पत्रांप्रमाणेच इतर पत्रांसाठी नटांची जमावा जमव पूर्ण झाली. संगीत शाकुंतल नाटकाच्या पहिल्या चार अंकाचा प्रयोग अण्णासाहेबांच्या किर्लोस्कर नाट्य-मंडळीने पुण्यातील आनंदोद्भव नाटकागृहात  ३१-१०-१८८० या दिवशी करून दाखवला. अशा प्रकारे मराठी संगीत नाटकांच्या नव्या युगाची सुरुवात आणि संगीत रंगभूमीची स्थापना किर्लोस्करांनी केली.१०
'संगीत शाकुंतल'नाटकाच्या पहिल्या प्रयोगाने मराठी रंगभूमीवरील संगीत नाटकाचे युग सुरू झाले. त्यानंतर दोन वर्षानी पुण्यातील आप्पा बळवंतांच्या वाड्याजवळ असलेल्या त्यावेळच्या 'पूर्णांनंद' नाटकगृहात १८ नोव्हेंबर १८८२ रोजी, 'सौभद्र' नाटकाचा प्रयोग करून अण्णासाहेबांनी संगीत नाटकाचे जनक ही भूमिका मराठी रंगभूमीच्या इतिहासात चिरस्थायी केली. किर्लोस्करांनी आपल्या नाटकात पदांची रेलचेल केली. साकी,दिंडी, कामदा,या जातीवृत्तांचा सढळ उपयोग केला. अण्णासाहेबांची सरस,प्रासादिक आणि सुबोध पदरचना ही सामान्य प्रेक्षकांच्या तोंडी बसली.११


देवल पर्व:-

सांगली ही मराठी रंगभूमीची जन्मभूमी समजली जाते. सांगली शहरापासून तीन मैल अंतरावर हरिपूर नावाच्या गावात १३ नोव्हेंबर १८५५ रोजी देवल यांचा जन्म झाला.त्यांना कवितेचा नाद लहानपासूनच होता. अण्णासाहेबांच्या सहावासात त्यांना नाटकाचा नाद लागला. अण्णासाहेबांच्या सहवासात देवलांचा मराठी रंगभूमिशी सबंध आला, आणि अण्णासाहेबांना देवल गुरु मानू लागले.१२
अण्णासाहेब किर्लोस्करांची थोर परंपरा यशस्वी रीतीने चालवणारे नाटककार म्हणून देवल यांची महत्वाची भूमिका आहे. देवल यांची शारदाआणि मृच्छकटीक ही नाटके आजही मराठी रंगभूमीवर टिकून आहेत. नाट्य-पदरचनेत प्रसादपूर्ण,सुबोध रसाळ आणि भावपरिपूर्ण अशी पदे रचली.काय पुरुष चळले बाई’‘कधी करिसी लग्न माझे या पदांनी प्रेक्षकांच्या मनावर मोहिनी घातली.आज गायनात ती टिकून आहेत. तसेच शारदेतील म्हातारा इतुका’‘श्रीमंत पतीची रानी ही पदे सर्व श्रेष्ठ आहेत. देवलांच्या मृच्छकटीकया नाटकातही संगीत ओतप्रेत भरलेले आहे. त्याचप्रमाणे संशयकल्लोळ नाटक आजही प्रसिध्द आहे.१३

कोल्हटकर यांचे पर्व:-

     किर्लोस्कर आणि देवल यांच्या प्रमाणेच मराठी रंगभूमीवर नाट्य आणि नाट्यसंगीत याबाबतीत श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी एक नवे पर्व सुरू केले. यामध्ये किर्लोस्कर संगीतातील साक्या दिंड्या या व्यतिरिक्त वेगळ्या ढंगानी पदे रचली. भाऊरावांच्या अमदानीत त्यांचे वीर तनय हे नाटक  किर्लोस्करांच्या रंगभूमीवर आले. त्यानंतर आलेले मूकनायकहे नाटक यातील सर्वच पदे लोकप्रिय झाली. त्यानंतर आलेले गंधर्व युग यामध्ये बालगंधर्व १९०५ साली किर्लोस्कर संगीत मंडळीत दाखल झाले. संगीतमंडळीत दाखल झाले. संगीताबाबत पाहता जवारीदार स्वरेल आवाज, अत्यंत लवचिक गळा, ताल, व लय हे सर्व गुण बालगंधर्वकडे होते.१४
     अशा प्रकारे संगीत नाटकांची परंपरा सुरू झाली आणि त्यांचा विकास झाला. यात किर्लोस्कर आणि देवल हे गुरुशिष्य, कोल्हटकर आणि त्यानंतर आलेले बालगंधर्व यांनी संगीत नाटकाची खूपच महत्वपूर्ण अशी मोहकता निर्माण केली. यातून सामाजिक प्रश्न, राजकीय, धार्मिक अशा प्रश्नांना समाजातील लोकांचे लक्ष वेधून समाजातीलरूढी परंपरा नाहीशा करण्याचा प्रयत्न केला.
     किर्लोस्करांनी बसविलेले मतिविकार हे कोल्हटकरांचे पुनर्विवाहावरील  नाटक १९०७ नंतर १९१० साली त्यांचेच बसविलेले प्रेमशोधन नाटक अयशस्वी झाले. त्यानंतर बालगंधर्वासारखे देखणे आवाजदार गायक नट, कोल्हटकरांच्या नाटकांमध्ये श्री बोडसे आणि खाडिलकर यांच्या तालमीमुळे, गायनाप्रमाणे अभिनयही बरीच प्रगतीकरीत होते. या नटांच्या यशाने व गुणाने एक नाटक लिहावे म्हणून मानापमान हे नाटक किर्लोस्करांनी बसविण्यास सुरुवात केली. यातील पात्रांना शोधतील अशा भूमिका लिहिल्या. त्यातील धैर्यधर भामिनी यांच्या भूमिका गाजल्या.१५
    
मराठी रंगभूमीवर सुवर्णयुग निर्माण करणारे खाडिलकर:-

     कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर म्हणजेच काकासाहेब खाडिलकर यांनी सवाई माधवराव यांचा मृत्यू हे पहिले लिखित स्वरूपाचे नाटक लिहिले. परंतु १९०६ मध्ये ते रंगभूमीवर आले त्यानंतर १९०१ मध्ये त्यांचे कांचनगडची मोहनाहे नाटक हे नाटक महाराष्ट्र नाटक मंडळीने रंगभूमीवर आणले. त्यानंतर जी नाटके लिहिली त्या नाटकांनी मराठी रंगभूमीवर सुवर्णयुग निर्माण केले. आणि १९२० पर्यंतच्या लिहीलेल्या आणि गाजलेल्या नाटकांमुळे या कालखंडाला खाडिलकर युगाचा कालखंड म्हटले गेले. खाडिलकरांप्रमाणे वरेरकरांनी काही पौराणिक नाटकांचे लेखन केले. वरेरकरांची अनेक सामाजिक नाटके खाडिलकर युगात चांगली लोकप्रिय ठरली.१६
     किर्लोस्करांनी नाट्यसंगीताची परंपरा निर्माण केली मराठी नाट्यसंगीताच्या दृष्टीने पाहायल तर शाकुंतल हे नाटक रंगभूमीवर आल्यावर एका नविन पर्वाला सुरुवात झाली. किर्लोस्करांनी जी अडीच संगीत नाटके लिहिली तरी त्यातील संगीताची जनमानसांवर खूप पकड बसली. एवढी पकड बसली की २५ वर्षे किर्लोस्कर संगीत असे नाव दृढ झाले. किर्लोस्कर नाट्यसंगीताचे वैशिष्ट असे होते की त्यामध्ये रागदारी संगीत लावणी, कीर्तन, टप्पा, ठुमरी, लोकगीते, स्त्रीगीते, कर्नाटकी संगीत इत्यादी. सर्व प्रकार या नाट्यसंगीत पाहयाला मिळतात. यामुळे नाट्यसंगीताचा सर्वार्थाने रस परिपोष साधला गेला. बाळकोबा नाटेकर, मोरोबा वाघुलीकर भाऊराव किर्लोस्कर यांच्या सारखे गायक आणि चतुरस्त्र असे कलाकार किर्लोस्कर कंपनीला मिळाले या सर्वामूळे मराठी नाट्य संगीताची वैभवशाली परंपरा निर्माण झाली. या नाट्यसंगीताने रागदारी संगीताची आवड व समाज निर्माण करून मराठी रसिक प्रेक्षकांमध्ये अभिरुचि निर्माण केली. किर्लोस्कर नाट्यसंगीताचा काळ हा पंचवीस वर्षाचा होता. यामध्ये यातेश्वर, डोंगरे, पाटणकर इत्यादी नाटककारांनी ही प्रयोग केले. आणि नाट्यसंगीतात भर घातली. परंतु मराठी रंगभूमीवर किर्लोस्कर मंडळींनी केलेले नाट्यसंगीताचे वर्चस्व राहिले. गोविंद बल्लाळ हे अण्णासाहेब किर्लोस्करांचे शिष्य होते. त्यांनीही नाट्यसंगीताची ही परंपरा कायम ठेवली होती. यामध्ये मृच्छकटीक’‘शारदा शापसंभ्रम अशा नाटकांमधून ही परंपरा चालविली अशा प्रकारे १९०१ पर्यंत म्हणजे भाऊराव कोल्हटकर यांच्या मृत्यू पर्यंत ही नाती परंपरा मराठी रंगभूमीवर टिकून राहिलेली दिसून येते. १७
     किर्लोस्करांच्या युगाच्या शेवटी पाहता श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांनी उर्दू, पारशी रंगभूमीवरील संगीत मराठी रंगभूमीवर आणण्याचा प्रयत्न केला यामध्ये चमत्कृतीजनक चाली उडत्या चाली मराठी नाट्यसंगीतात आणल्या आणि एक नविन नाट्यसंगीत परंपरा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. १९०१ ते १९१० पर्यंत मराठी नाट्यसंगीतात कोल्हटकरी प्रकारचे नाट्यसंगीत सुरू झाले. याच काळात पाहता महाराष्ट्रात बाळकृष्ण बुवा इचालिकरंजी, अब्दुल करीमखाँ, अल्लादिया खाँ, राहिमत खाँ, नथ्थन खाँ, असे उत्तर हिंदुस्तानी घरंदाज नामांकित गवई स्थायिक झाले. मराठी रंगभूमीवरील संगीताच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे गायक नटांनी संगीतातील आपले कौशल्य वाढविण्यासाठी या थोर कलावंताचे शिष्यत्व पत्करले. परिणामत: १९०१ नंतर मराठी रंगभूमीवर शास्त्रीय संगीताच्या अंगाचे नाट्यसंगीत निर्माण झाले. मराठी नाट्यसंगीताचे स्वरूप शास्त्रीय संगीताकडे अधिक झुकले.१८
     भास्कर बुवा बखले या गायकांनी १९०४ मध्ये किर्लोस्कर मंडळीचे गुरु झाले. यामध्ये गोविंदराव टेंबे हे भास्कर बुवा बखले यांचे शिष्य झाले. गोविंदराव टेंब्यांनी मराठी प्रयोग केले. त्यानंतर मांगला नानासाहेब जोगळेकर, बालगंधर्व यांच्या सारखे गायक नट आणि टेंबे यांच्या सारखा अभिजात संगीतातील सौदर्य दृष्टी असलेला दिग्दर्शक लाभला यामुळे मानापमान या संगीत नाटकाने नवीन पर्व सुरू केले. अशा प्रकरे १९१० नंतर कीर्तन सारखे संगीत मागे पडून रागदारी संगीताचा ललित स्वरूपाचा वापर केलेले मनोरम असे नाट्य संगतीचे स्वरूप निर्माण झाले. १९१०-१९३३ या काळात मराठी नाट्यसंगीत इतके  समृद्ध झाले की नाट्यसंगीत हा नवीन संगीत प्रकार संगीत क्षेत्रात प्रस्थापित झाला. बालगंधर्व केशेवराव भोसले, मास्टर दीनानाथ मंगेशकर, मास्टर कृष्णराव, गोविंदराव टेंबे, अशा अनेक लोकप्रिय कलावंताच्या सहाय्याने आणि त्याच संगीत स्व्रपाच्या मागे जाणारी अशी नाट्यसंगीताची परंपरा निर्माण झाली. १९३३ नंतर श्री. वि. वर्तकांच्या आंधळ्याची शाळा या नाटकाद्वारे मराठी रंगभूमीवर आले. या नाट्यसंगीताची जात भावगीताच्या गायनाची होती. आजच्या सिनेसंगीतपेक्षा भारदस्त परंतु अभिजात नाट्यसंगीतपेक्षा ललित आणि सुगम वळणाचे म्हणजे भावगीत वळणाचे नाट्यगीत होते. हे भावगीत वळणाचे नाट्यसंगीत १९५६ पर्यंत लोकप्रिय राहिले.१९
     मराठी रंगभूमीवर १९५५-५६ नंतर जुन्या वैभवशाली नाट्यसंगीत पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न झाला त्यानंतर दहा वर्षात जुन्या वैभवशाली युगाच्या स्मृती देणारे नाट्यसंगीत पंडितराज, जगन्नाथ, मत्स्यगंधा, मंदार,सुवर्णतुला, इत्यादी नवीन नाटकांतून तसेच रंगभूमीच्या सुवर्णकाळात गाजलेल्या नाटकांच्या प्रयोगातून सादर करण्याचे प्रयत्न केले गेले.
     साधारणपेणे १९६५ नंतर नाट्यसंगीताच्या सौदर्यमूल्यांबाबत त्यांच्या आवश्यकतेबदल त्याच्या स्वरूप विशेष लक्ष पुरवले जाऊ लागले. त्यामुळे गेल्या दहा वर्षातील नाट्यसंगीतात जुनी परंपरा रखणारे व नाट्यप्रयोगांचा स्वीकार करणारे, असे समिश्र संगीत स्वरूप पुढे आले. या गेल्या दहा वर्षात ययाती आणि देवयांनी, कट्ट्यार काळजात घुसली, धन्य गायनीकळा, मीरा मधुरा हे बंध रेशमचे वगैरे अभिजात संगीत स्वरूपाची नाटके आणि लेकुरे उदंड जाहली, अजब न्याय वर्तुळाचा, घाशीराम कोतवाल, माता द्रोपदी, देवाजीने करुणा केली. इत्यादी आधुनिक संगीताचे व लोकगीताचे प्रकार हाताळणारी नाटके अशी दुहेरी नाट्यसंगीत परंपरा निर्माण होत आहे.
     मराठी नाट्यसंगीताचा इतिहास आणि त्यातून होणारी नाट्यसंगीताची वाढ व विकास यावर दृष्टिक्षेप टाकला तर गेल्या दीड वर्षात महाराष्ट्रातील प्रादेशिक संगीतापासून प्रेरणा घेऊन निर्माण झालेले चित्र संगीत व पाश्चात्य संगीत यापासून प्रेरणा घेतलेले सर्व समावेशक असे नाट्य संगीताचे स्वरूप आहे. मराठी नाट्यसंगीताची ही परंपरा सलगपणे टिकून राहिली आहे. २०

तळटीपा
1. डॉतारा भावाळकर, मराठी नाटयपरंपरा: शोध आणि आस्वाद मेहता पब्लिशिंग हाऊस १२१६ सदाशिव पेठ. पुणे प्रथम आवृती १९९५ पानं क्र. १२
2. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी. मराठी विश्वकोश  खंड ८ महाराष्ट्र  राज्य साहित्य संस्कृती मंडळ.  पान क्र. ४६३
3. डॉ. मु. श्री. कानडे, नाट्य- शोधनिहारा प्रकाशन, बुधवार पेठ पुणे,प्रथमावृती  १९८७ पान क्र. २४
4. कित्ता पान क्र. २४, २५
5. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी. मराठी विश्वकोश  खंड ८ महाराष्ट्र  राज्य साहित्य संस्कृती मंडळ.  पान क्र. ४६३
6.  वसंत शांताराम देसाई, किर्लोस्कर आणि देवल,सौमया पब्लिकेशन प्रा.लि. १७२ मुंबई मराठी  ग्रंथसंग्रहालय मार्ग दादर पान क्र. ३,
7. कित्तापान क्र. ४
8. कित्तापान क्र.५
9. कित्ता पान क्र.५,
10.    कित्ता पान क्र. ७
11.    बाल सामंत,शुरा मी वंदिले, परचुरे, प्रकाशन गिरगाव मुंबई   पहिली आवुत्ती २००० पान क्र. १३
12.    वसंत  शांताराम देसाई, किर्लोस्कर आणि देवल, सौमया पब्लिकेशन प्रथम आवृत्ती पान क्र. ४७ ४८
13.    बाल सामंत, शुरा मी वंदिले, परचुरे, प्रकाशन गिरगाव मुंबई   पहिली आवुत्ती २००० पान क्र.१५, १६
14.    कित्ता पान क्र. १५, १६
15.    डॉ. के. नारायण काळे, वा.ल. कुलकर्णी, वा.रा. ढवळे. अमृत नारायण भालेराव स्मृतिग्रंथ, मराठी रंगभूमि मराठी नाटक प्रथमावृत्ती  १९७१ पान क्र. १३९
16.    डॉ. मु. श्री. कानडे, नाट्य- शोध नीहार प्रकाशन, बुधवार पेठ पुणे, प्रथमावृती  १९८७ पान क्र. ५५, ५९
17.    तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी. मराठी विश्वकोश  खंड ८ महाराष्ट्र  राज्य साहित्य संस्कृती मंडळ.  पान क्र. ४६३
18.    कित्ता पान क्र.४६३
19.    कित्ता पान क्र.४६४
20.    कित्ता पान क्र.४६४.
प्रकरण -२

मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा जीवन परिचय
मा. दीनानाथ मंगेशकर यांचे बालपण :-

     दीनानाथचा जन्म २९ डिसेंबर १९०० मध्ये झाला. त्यांचे बालपण श्री मंगेशकर या देवालयात गेले. दीनानाथांच्या वडीलाचे नाव गणेश भट भिकोबा अभिषेकी तर दीनानाथांच्याआईचे नाव येसूबाई. दीनानाथांचे वडील मंगेशाचे प्रमुख उपाध्ये होते. दीनानाथांची आई धार्मिक होत्या. नेहमी मंदिराची स्वच्छता करणे, पूजेची व्यवस्था करणे अशी कामे त्या करीत. तसेच ग्रंथाचे वाचन आणि पठण ही करित असत.१
     दीनानाथ मोठया नवसाने झालेले. असल्याने आणि त्यांच्या घराण्यात कित्येक वर्ष मुलं नव्हत. त्यामुळे सर्वांचाच दीनानाथांवर  खूप जीव होता. दिना किंवा दिनूलीअशी त्यांना लाडाने हाक मारली जाई. दीनानाथांचे  वडील गणेश भट्ट अभिषेकी हे मंगेशाचे प्रमुख उपाध्ये होते. मध्यम ऊंची, सावळा वर्ण, प्रभावी व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे प्रवचनात आणि  वेदघोषात आढळून येणारी त्यांची अस्खलित वाणी आवाजातील उच्चारणातील अमोघ फेक, तरतरी नाक, लक्ष वेधून घेणारे भव्य डोळे आणि ठसठशीत ओठांची उमलती ठेवण,प्रेमळ स्वभाव, करारीपणा असे दीनानाथांच्या वडीलाचे व्यक्तिमत्व होते. दीनानाथांना  हे बव्हंशी लागू पडते. २
     “वत्स व शांडिल्या गोत्राचे सारस्वत ब्राम्हण हे मंगेशाचे मुळ महाजन होते. त्यांची चोवीस आडनावे होती. त्यामुळे मंगेशीच्या परिसरत मराठी महिण्याप्रमाणे वेगवेगळे कार्यक्रम सादर होत असत. जसे चैत्रात देवळामध्ये रामायणाचे पारायण, वसंत पूजेच्या कार्यक्रम, राम नवमी उत्सव, वैशाखात अक्षय तृतीय, समाराधना,जेष्ठ महिण्यात श्री मंगेशाला जत्रोत्सव अशा वेगवेगळ्या कालांच्या सानिध्यात दीनानाथांचे बालपण गेले. त्यामुळे अशाप्रकारे सण आणि उत्सव साजरे होत होते. त्यातूनच धर्म आणि संस्कृतीचे जतन झाले. दीनानाथ ज्या श्री मंगेशाच्या गोमंतक परिसरात लहानाचे मोठे झाले. या परिसराचे सौदर्य ही खूपच सुंदर आणि अलौकीक आहे. अनेक घरण्यांनी गोमंतकात राज्य केले.३

गोमंतकांची सौदर्य सुष्टी आणि इतिहास:

     गोमंतक या भूमीला निसर्गाचे महान योगदान लाभले आहे. पूर्वेला उत्तुंग सह्याद्री, पश्चिमेला असणारा सागरी किनारा आणि तिन्ही बाजूने महाराष्ट्रांनी वेढलेला आहे. गोमंतकावर पोर्तुगीजांनी आक्रमण करण्याआधी तेथे शिलादा कदंब, देवगिरीचे यादव, ब्राह्मणीचे सुलतान, विजय नगरीचे राय, यांनीही गोमंतकावर राज्य केले. पण येथे देवालयाचे वैभव असल्यामुळे गोमंतकाच्या सृष्टी सौदर्याची महती अनेक जणांनी वर्णन केली आहे. “प्रख्यात कादंबरीकार वि.स.खांडेकर” लिहितात. गोमंतक हा महाराष्ट्रच्या राजवाड्यातील नुसता निसर्गाचा खजिना नव्हे तर, ते त्याचे कला मंदिर आहे’.“रुपडी” याग्रंथात ज.स. सुकटणकर लिहितात “गोमंतकाचे स्वरूप कसे आहे. हे समजावून घेण्याचा जवळचा मार्ग म्हणजे त्याच्या नावापासून सुरुवात करणे होय”. गोमंतक या शब्दातच त्यांच्या रूपाचे प्रतिबिंब पडलेले दिसते.गो म्हणजे गाय नि मंत म्हणजे युक्त या अर्थाने गुरांनी भरलेला प्रदेश गोमंत हा होय.४
     नारळ सुपारीच्या बागा, केळी, काजू, कोकम,रातंबे, इत्यादि वृक्षांची घनदाट शोभा काळसर हिरवी गर्द अरण्ये, काळेभोर कडे, नद्यांच्या व खाड्यांचे नागमोडी व गडद निळे प्रवाह यातून पांढरी शुभ्र  शिडे डोलवीत जाणारे पडाव. नारळी पोकळीच्या रांगा, मशागत केलेली शेती, लालभडक माती, आणि अशा ठिकाणी कलाप्रेमानी भरलेल्या आणि निसर्ग सौदर्याने नटलेल्या मंगेशीच्या परिसरात दीनानाथांचे बालपण गेले.५
     दीनानाथ बुद्धिमान व ईर्षावान व खोडकर होते. तसेच ते प्रेमळ होते. गाण्याची त्यांना आवड होती. तसेच गळ्यात एक जोश होता जे कानावर पडेल ते चटकन उचलले जाई. कुणी गाणे म्हण म्हटले की ते आढे-वेढे न घेता चटकन म्हणून दाखवित.६
     दीनानाथांचा अभ्यासाकडे कल नव्हता. एक-दोन इयत्ता इतकेच शिक्षण घेतले. बालवयात दीनानाथांना गाण्याखेरीज गोट्या खेळणे, बाल सवंगडी जमवून त्यांना सर्वांना ऐकलेल्या कार्यक्रमांचे साभिनय अनुकरण करून दाखवण्याचा छंद होता. त्याचप्रमाणे दुसर्‍यांचे गाणे ऐकणे हा ही छंद होता.
     अशाप्रकारे दीनानाथांचे व्यक्तिमत्व नाटक संगीत, शास्त्रीय संगीत अशा कलामधून घडत गेले.७
     दीनानाथांला आपल्या नाट्यसंगीत व्यवसायाची सुरुवात पूर्वजांच्या नावाशी जोडून करायची नव्हती. आपल्या गावाशी व मंगेश या दैवताशी मात्र ते प्रामाणिक राहिले. व त्यांनी अभिषेकी या आडनावचा त्याग करून मंगेशकर हे आडनाव लावायला सुरुवात केली. गावोगावी प्रयोग करणार्‍या नाटक कंपन्यात ते काम करू लागले.८
     किर्लोस्कर नाटकमंडळीत राहून त्यांनी केवळ महाराष्ट्रात नव्हे तर दिल्लीपासून कलकत्तापर्यंत हिंदी नाटकात व उर्दू नाटकातही काम केले.
     या अनुभवावर त्यांनी वयाच्या १८वर्षी आपली बळवंत नाटक मंडळी स्थापन करून शाकुंतल हे पहिलं नाटक रंगभूमीवर आणलं.९
     गावोगावी बळवंत संगीत मंडळीची नाटक गाजू लागली यशाच्या पायर्‍या एका मागोमाग एक सर होत होत्या. शास्त्रीय गायनाशी आपल वेगळं स्थान निर्माण केल. लताच्या जन्माच्या वेळी दीनानाथांनी रंगभूमि अशी गाजवली होती की त्यांच्याकडे अनेक मोठमोठ्या लेखकांनी कंपनीसाठी नाटक लिहिण्याची इच्छा प्रदर्शित केली होती.१०
दीनानाथांचे व्यक्तिमत्व:-

     दीनानाथअत्यंत देखणे व सुंदर दिसत. त्याचप्रमाणे हरणाप्रमाणे चंचल नेत्र, विशाल भालप्रदेश, मोहक मुद्रा,गोरा वर्ण, कुरळे के, उंच निसडपातळ,नाजुक बांधा, आणि सौदर्याला साजेसाच गोड आवाज तसेच उपजत धीट आणि हजरजबाबी होते. नृत्य आणि संगीत याची त्यांना लहानपणापासूनच आवड होती.११
गोमंतकालीन जागर, कळसूत्री,बाहुल्यांचे खेळ, काला, गोपाळकाला, दशावतार, धालो, इ. लोककला येथे सादर होत असत, आणि अशा  कलांच्या सानिध्यत दीनानाथ मोठे झाले. त्यांच्या  अंगातील सुप्त गुण पाहून त्यांच्या आईने त्यांना संगीताचे शिक्षण द्यावे असे ठरविले.१२
      गोमंतकाजवळ असलेले मालवण मधील विठोबा अण्णा हडप यांनी ग्वाल्हेरला जावून संगीताची साधनाकरून गुरुच्या आज्ञेने गावात राहून अनेकांना शास्त्रशुद्ध संगीताची गायनाची तालीम दिली. सरस्वती बांदोडकरया पाहिल्याशास्त्रीय संगीत शिकलेल्या विठोबा अण्णा यांच्या पहिल्या शिष्या होत्या.१३.
      विठोबा अण्णानीगोमंतकात शास्त्रीय संगीताचे रोप लावले. शास्त्रीय संगीताची सुरुवात केली. तेव्हापासून गोमंतकामध्ये शास्त्रीय संगीताची आवड निर्माण झाली. अनेक शिष्य परिवार निर्माण झाले. त्यानंतर बाळकृष्ण बुवा, इचलकरंजीकर यांचे शिष्य दत्तूबुवा भिडे यांनी ख्याल गायकी प्रचारात आणली. १४
     सन १८७० च्या सुमारास गोमंतकांमध्ये गायनाचार्य “रामकृष्ण वझे” यांचे आगमन झाले. त्यांचे व्यक्तिमत्तव पाहता ते मनमेळावू वृत्तीचे, बहुश्रुत व सर्व गायन प्रकारात तरबेज होते. त्यामुळे गोमंतकातील प्रतिष्ठानपर्यंत संगीत कला पसरली, आणि तिला दर्जा मिळाला. १९ व्या  शतकाच्या  शेवटी गोमंतकांत रसिकांबरोबरच संगीत क्षेत्रातअनेक महान गायक, वादक, नर्तक नावारूपाला आले.१५
     अशा वातावरणात दीनानाथांचे बालपण गेले. आणि त्यांना संगीतनृत्य गायन याचीही आवड होती. दीनानाथ याचा आवाज सुरेल,गोड, आणि ईश्वर दत्त होता. त्यामुळे पैशा- दोन पैशाच्या बिदागिरीवर देवळात येणार्‍या-जाणार्‍या लोकांना पदे म्हणून दाखवत.१६
     एका रामनवमीला “दामाजी” या मुख्य नाटकातदीनानाथांनी नाटकातले पहिले काम केले. त्यमध्ये “गुन्हेगारी” धन्याची काय नायजी हे एक पद होते. परंतूदीनानाथांच्या आवाजात आणि हे पद लोकप्रिय झाले. इतके लोकप्रिय झाले कि सर्व पंचक्रोशीत पसरले.१७
दीनानाथांचे  तेव्हाचं गाणे मुक्त होते. त्यांची स्वरस्थाने पक्की होती. तान उपजत होती. सुरुवातीस तान घेत. विंगमधून येत, आणि पद सुरू करत. तेव्हाचा दीनानाथांचा आवाज बारीक, एकेरी पण धारदार होता. त्यामागे  विलक्षण जोर असायचा सुर कोणतेही असले काहीही असले तरी ते बेसूर होत नसत.१८
     असमान्या आवाजीच्या गाण्याने दीनानाथांच्या गाण्याचे अलौकिक सर्वात्र पसरले. इकडून तिकडून बोलावणी येऊ लागली.“सौभदा”तील पांडू नृपति जनक जया हे पद ते विशेष म्हणत पण किर्लोस्करांच्या “शाकुंतल” “सौभदा” नटाकांतील किंवा अवांतर संगीत नाटकातील पदे ते सर्वसाधारणपणेम्हणत. कुणी कुणी दीनानाथांनासांगत “अरे तू नारायणरावबालगंधर्व पद म्हणत जा. लोकांना खूप आवडत. तुझे त्यामुळे जास्त नाव होईल” तेव्हा लहानवयातही दीनानाथ ताडकन उत्तर देते. “मला प्रसिद्धी मिळेल ती गंधर्वाची गाणी चांगली गातो” म्हणून मला तस नको आहे. मला कुणाची  नक्कल करावयाची नाही. मला माझं स्वत:च गाण गायच आहे.१९
     दीनानाथांना त्यांच्याकडे सारंगी शिकवण्यासाठी पाठविण्यात आले. लांब हाताची पैरण (तिला पुढ्यात खालच्या बाजूने मध्यावर खिसा आणि त्यात काजू-शिश्याचे गडडे), पंचा नेसलेले, सावळे, टपोर्‍या पाणीदार डोळ्याचे, हसतमुख पण कृश आणि किणकीण्या आवाजाचे पांडीमामांच्या घरी सारंगी शिकायला दाखल झाले.२०
     पांडीमामांनी पहिल्या दिवशी पाठ म्हणून शुध्द सप्तकाचा लयबध्द आरोह-अवरोह सांगितला, पण हे  अवरोह तार ऋषभाने सुरू करत असत.
सा रे ग म प ध नीसां / रेंसां नि  ध प म ग रे सा / त्यांनी प्रथम हाताने टाळी देत ती सरगम दीनानाथांकडून म्हणवून घेतली. मग सारंगीवर खड्ने स्वरस्थानांच्या खुणा करून दिल्या आणि त्यांच्याकडून ती सरगम वाजवून घेतली. दीनानाथांना ती चटकन आली, बसली  ती निश्चित व सुरेल स्वरुपात. शिक्षण नियमित चालावे म्हणून दीनानाथांची आई एकासारंगी आणि दुसर्‍या हाताशी दीनानाथ यांना घेऊन पाच-सहा मैलांवर असलेल्या गुरुगृही चालत येत असे. काही महीने हे वादन शिक्षण व्यवस्थित चालू होते.२१
     दीनानाथांना त्यात गती आहे हे त्यांच्या प्रगतीवरून स्पष्ट दिसत होते. फार तय्यार नसेल पण दीनानाथांचा सारंगीवरील हात अतिशय गोड होता, सुरीला होता. गज गज स्थिर ठेवून भरावयाचा स्वर हे अतूट व मुलायम घेत. पुढे सारंगिया हरिराम रामनाथकर या गायक नटाने संगीतावर हात टाकताना पाहून चकित झाला, आणि स्वतपेक्षा दीनानाथांची सारंगी अधिक गोड बोलू लागली. हे पाहून काहीसा चक्रावून गेला.२२
     दीनानाथांचा सारंगीशी कायमचा संबंध जुळावा असे विधिलिखित नव्हते. त्याला सकृतदर्शनी दोन करणे घडली.दीनानाथांना बालपणी नखे खाण्याची सवय होती. त्यामुळे नखे खुरटलेली असत. त्यामुळे सारंगी वाजवायला त्रास व्हायला लागला. दुसरे कारण पांडीमामकडून सदूमामा मडकईकरांकडे शिकण्यासाठी एकदा दीनानाथ आले असताना सदूमामांनी शेजारच्या गुत्यावरून दारू आणायला सांगितली त्यामुळे त्यावेळी दारुमुळे होणारी दुर्दशा ऐकलेली, क्वचित पाहिलेली असल्यामुळेदीनानाथांच्या मनात इतकी भीती वाटली की, ते दूसरा कसलाही विचार न करता सारंगी उरापोटी घेऊन पाच मैल धावत-धावत घरी गेले. पुन्हा ते सारंगी शिकायला आलेच नाहीत. तिथेच त्यांचे सारंगीचे शिक्षण संपले.२३
     दीनानाथांची आई जिद्दीची होती. सारंगी नाही तर तबला शिक म्हणून तिने शंभर रुपयेदेणून रघुनाथ मामा उर्फ बाबा माशेलकर यांचा गंडा बांधला आणि दीनानाथांचे तबला शिक्षण सुरू झाले. रघुनाथ माशेलकरांचा तबलावादनात लौकिक असून त्यांनीच संगीतरंगभूमीवरील पहिल्या व्यावसायिक “संगीत शाकुंतल” या नाटकाला ३१ ओक्टोंबर १८८० च्या प्रथम प्रयोगाला तबला साथ केली होती.२४
     तबला शिकण्यातही दीनानाथांचा जीव रमेना. दुसरी एक अडचण अशी होती की, तबला वाजवताना त्यांचे हात घामाने ओलसर होत त्यामुळे तबला दमट होई. योगायोग असा की, रघुनाथमामांच्या पत्नी मधुराबाई यांनी दीनानाथांला काम करता करता गाणे गुणगुंणतानाऐकले. मधुराबाईनीदीनानाथांनी नैसर्गिक गाण्याची आवड आहे हे ओळखले. त्यांना दीनानाथांच्या गळ्याची कल्पनाही आली होती. त्या बाबांना म्हणल्या “अहो हा गाणंच चांगल गाईल, तुम्ही त्यांला गाणच शिकवा”. बाबांना ते पटले.२५ 
     रघुनाथमामा स्वत: गायनाचार्य भास्कर बुवा बखले यांचे गुरुबंधु असल्याने तबल्याबरोबरच शास्त्रीय गायनातही पारंगत होते. त्यांची  भास्करबुवांवर अतिशय भक्ति होती. त्यामुळे भास्करबुवांच्या गाण्याच्या बैठकीत ते तबल्यावर साथसंगत करत. दीनानाथांना खानदानी शिस्तबध्द गाणे शिकविण्यास बाबा माशेलकरांनी सुरुवात केली.२६
दीनानाथांची बहीण विजयाबाई यांनी ज्या आठवणी सांगितल्या आहेत. त्यामध्ये दीनानाथांच्या संगीतमय बालपणाचे दर्शन घडते. त्या लिहितात “आमचा दीना लहानपणा पासूनच हुशार, शिक्षणपेक्षा गाण्याकडे त्याचा ओढा अधिक होता. हे पाहून आईने त्याला प्रथम सारंगी शिकवण्यास ठेवला. परंतु ते गुरुजी जरा व्यसनी असल्यामुळे त्यांचे व दीनाचे पटेना. एके दिवशी सकाळी सारंगी खाकोटास मारून स्वारीघरी दत्त म्हणून हजर झाली. तेव्हा तबला शिकवण्यास त्याला बाबा मागेलकरांकडे ठेवला. ते त्याच्या गाण्याचा नाद पाहून आईला म्हणाले “येसूबाई मी तुमच्या मुलाला गाणे शिकवितो, लहानपणी त्याला कोणी पद म्हण म्हणून सांगण्याचा अवकाश स्वारी लगेच तयार पांडू नृपति हे त्याचे पेटंट पद होते. कंपनीत जाण्याच्या अगोदर खेडेगावात यात्रा होतात, त्या प्रसंगी काही हौशी लोक नाटके करतात. त्यावेळी दीना त्या नाटकातून २ पदांचे छोटेसे काम करीत असे. दामाजी” नाटकातील गुन्हेगारी धन्याची काय नाही जी हे त्याचे पद गोव्यात फारच लोकप्रिय झाले होते. या पदाला तो त्यावेळी ४-५ वेळा वन्स्मोर घेत असे. लहानपणी त्याला खेळण्याची फार आवड, पोहोण्याची आवड होती. एकदा पोहायला तळीत गेला की, २-३ तास वर येत नसे. एकदा त्याचा भाऊ त्याच्याबरोबर पोहत होता॰थोड्या वेळात दीनाला दिसून आले की बाळू बुडतोय. त्यावेळी लगेच त्यांची ची शेंडी धरून पोहत पोहत कडेला आणले आणि त्याचे प्राण वाचविले. त्यावेळी त्याचे वय ९-१० वर्षाचे असेल.२७
     दीनानाथांनी संगीतात केलेली प्रगती पाहून त्यांचा अलौकिक सर्वत्र पसरला. दीनाला त्यावेळी एकदम तीन कंपन्यांची बोलावणी आली. सर्वात प्रथम किर्लोस्कर नाट्यमंडळीचे व्यवस्थापक व्यंकटराव पनवेलकर हे येऊन जवळ जवळ नक्की करून गेले होते. नंतर दत्तोपंत हल्पाळकर व गंधर्व संगीत मंडळीचे गोविंदराव टेंबे आले. त्यावेळी टेंबे म्हणाले “ आई तुम्ही दीनाला आमच्याकडे पाठवा. दीनासाठी मंगेशीपासून पणजीपर्यंत रुपयांची राग लावतो.”आईने त्याला नाकारून दीनाला किर्लोस्कर संगीत मंडळीत पाठविण्याचे ठरविले.
     दीनाला नाटकमंडळीत पाठविण्यास घरातील मंडळींचा तीव्र विरोध होता. दीनाला किर्लोस्कर मंडळीत पाठविण्यास किर्लोस्कर मंडळीचे हितचिंतक असलेले पणजीचे कै. मंगेशराव देशपांडे, दादा वैद्य, कवळे येथील शांतदुर्गा देवीचे पुजारी वेदशास्त्र संपन्न दुर्गा भटजी या मंडळींनी दीनाच्या आईला पाठिंबा दिला आणि दीना किर्लोस्कर मंडळीत येऊन दाखल झाला.२८
     किर्लोस्कर नाटक मंडळी महाराष्ट्राचे अभिमानाचे स्थान असलेली आद्य संगीत नाट्यसंस्था होती. किर्लोस्कर मंडळींनी संगीत शाकुंतल हे संगीत नाटक रंगभूमीवर आणले. हे संगीत नाटक खूपच लोकप्रिय झाले. किर्लोस्कर देवलांच्यानंतर श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांची संगीत नाटके आली. त्यांची नाटके वेगळ्या बाजाची होती, किर्लोस्करांच्या संगीत शकुंतलमध्ये  पदांची संख्या विपुल संवाद, स्वागत, गीत, अशी वैविध्यपूर्ण पदांची योजना केली, विविध वृत्त, श्लोक, आर्या, कामदा, कटाव, साकी, दिंडी, ओवी, अंजनी, गीत, माजघरतील गाणी, अशा विविध पदरचना होत्या. यामुळे आणि बाळकोबा नाटेकर आणि मोरोबा वाघोलीकर या दोन कलाकारामुळे संगीत शाकुंतल नाटकांचे यश आणि संगीत कळसाला पोहोचले. काही काळानंतर कोल्हटकर, किर्लोस्कर नाटक मंडळीत आले. कोल्हटकरांच्या नाटकात पारशी उडत्या चालीची, खटका मुरक्याची नाट्यापदे आली. तसेच काल्पनिक कथानक, पाश्चात्य नाटकांच्या धार्तीवर कथेची गुंफण  कोट्यांनी युक्त असे संवाद, विनोद, काव्यात्मक यांचा अंतर्भाव होता. स्वत: कवी जाणकार संगीतपण असल्यामुळे आधीचाल बांधून त्यावर नंतर श्रीपाद कृष्ण शब्द रचना करत असत.    
     किर्लोस्कर देवल, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, खंडीलकर, गडकरी अशा लेखकांच्या संगीत नाटकांच्या परंपरा आपल्या स्वतंत्र बाजाच्या नाटकांनी लोकांना संगीत रंगभूमिकडे आकर्षित करीत होत्या.२९
     बाळकोबा नाटेकर, मोरोबा वाघोळीकर, भाऊराव कोल्हटकर, कृष्ण राव गोरे, शंकर राव सरनाईक, गोविंदराव टेंबे,माननीय कृष्णराव फुलंदीकर, सवाई गंधर्व, नारायणराव जोगळेकर, गंगाधरपंत लोंढे, बाबुराव पेढारकर हे गायक-नट म्हणून गाजत होते, त्याचप्रमाणे बाल गंधर्व केशवराव भोसले, त्यांनी आपली स्वतंत्र गायन परंपरा रंगभूमीवर इ स. १८८० ते १९१३  या कालखंडात प्रस्थापित केली होती, अशा पार्श्वभूमीवर १९१४ मध्ये माननीय दीनानाथ महाराष्ट्रातील किर्लोस्कर मंडळीत आले.३०
दीनानाथांचे किर्लोस्कर मंडळीत पदार्पण:-
     किर्लोस्कर नाटक मंडळीतील सर्वात उत्कृष्ट नटसम्राट बालगंधर्व हे गणपतराव बोडस, गोविंद टेंबे यांच्या सह १९१३ किर्लोस्कर सोडून गेले होते. त्यामुळे कंपनीची दुरवस्था झाली होती. अशावेळी दीनानाथ किर्लोस्कर नाटकमंडळीत येऊन दाखल झाले.
     किर्लोस्कर मंडळी गोवा आणि कर्नाटकचा दौरा संपवून दीनानाथांना घेऊन पुण्यात आली. पुण्यात आल्यावर दीनानाथांची पहिली भूमिका शारदा या नाटकात वल्लरीची भूमिका केली. त्यानंतर चंद्रहास नाटकातील विषया या राजकन्येची भूमिका दीनानाथांनी दंभस्पोट या नाटकात मुरलीची भूमिका अशा स्त्री भूमिका केल्या, यातून त्याची कीर्ती सर्वत्र पसरली. त्यानंतर त्यांनी ताज-ए-वफा, मानपमान, सौभद्र , विद्याहरण अशी अनेक नाटके केली, अशा प्रकारे दीनानाथांचे संगीत नाटकात पदार्पण झाले.३१

तळटीपा:-
१.    बाळ सामंत, “शुरा मी वंदिले”, पहिली आवृती ४ मे २०००. पान क्र ५
२.    प्रभाकर, जठार “दीना दिसे मज दिन रजनी” पहिली आवृती १९९०/ १९१२ पान क्र. १७, १८,
३.    बाळ सामंत, “शुरा मी वंदिले”, पहिली आवृती ४ मे २०००. पान क्र ६
४.    कित्ता पान क्र १
५.    कित्ता पान क्र २
६.    वंदना रवींद्र घांगुर्डे, “ब्रीद तुझे जागी दीनानाथ” पहिली आवृती ६ एप्रिल २०११ पान क्र ३१
७.    कित्ता पान क्र ३१
८.    पोतदार, अनुराधा महान स्त्रिया” आवृती पहिली २९ औगस्ट २०१३ परी प्रकाशन पान क्र. ५४
९.    कित्ता पान क्र ५४
१०. कित्ता पान क्र ५४
११. बाळ सामंत, “शुरा मी वंदिले”, पहिली आवृती ४ मे २०००. पान क्र ८
१२. कित्ता पान क्र ०७
१३. वंदना रवींद्र घांगुर्डे, “ब्रीद तुझे जागी दीनानाथ” पहिली आवृती
अनुबंध प्रकाशन पान क्र. २९
१४. कित्ता पान क्र २९
१५. कित्ता पान क्र २९,३०
१६. कित्ता पान क्र ३१
१७. प्रभाकर जठार, “दीना दिसे मज दिन रजनी” पहिली आवृती १९९०/
    १९१२ पान क्र. २०
१८. कित्ता पान क्र २०
१९. कित्ता पान क्र २०
२०. कित्ता पान क्र २०
२१. वंदना रवींद्र घांगुर्डे, “ब्रीद तुझे जागी दीनानाथ” पहिली आवृती  
   अनुबंध प्रकाशन पान क्र. ३५
२२. प्रभाकर, जठार “दीना दिसे मज दिन रजनी” पहिली आवृती १९९०/
१९१२ पान क्र. २१
२३. वंदना रवींद्र घांगुर्डे, “ब्रीद तुझे जागी दीनानाथ” पहिली आवृती  
   अनुबंध प्रकाशन पान क्र. ३६
२४. कित्ता पान क्र ३६
२५. कित्ता पान क्र ३६
२६. कित्ता पान क्र ३६
२७. बाळ सामंत,  “शुरा मी वंदिले”, पहिली आवृती ४ मे २०००. पान क्र      १०
२८. कित्ता पान क्र १०
२९.  वंदना रवींद्र घांगुर्डे, “ब्रीद तुझे जागी दीनानाथ” पहिली आवृती  
   अनुबंध प्रकाशन पान क्र. ४०
३०. कित्ता पान क्र ४०
३१. कित्ता पान क्र ४१
३२ महाराष्ट्र टाइम्स ९ एप्रिल २०१७ दीनानाथ प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर


प्रकरण ३

दीनानाथाची नाटक क्षेत्रातील कामगिरी

     दीनानाथांनी व्यावसायिक रंगभूमीवर प्रथम “ताजे-ए-वफा”या नाटकातून प्रदर्पण केले. या उर्दू नाटकमध्ये त्यासाठी उर्दू उच्चारासाठी तालिम त्यांनी घेतली आणि लवकरच ती आत्मसात केली. हलकी फुलकी दुय्यम भूमिका त्यांना शोभून दिली. विशेष म्हणजे त्यांच्या रंगभूमीवरील संगीतांचे प्रेक्षक भारावून गेले. उंच शेलाटा बांधा, तरतरीत पाणीदार डोळे, असा सर्वांना हवाहवासा वाटणारा दीना प्रसिध्दीच्या प्रकाशात आला. त्याची त्या काळजी आवडीची दोन पदे म्हणजे “हार जमाना हीरो तोरा काहे को” व “बालम सुरतीय तोरी देखणे निंदिया जाये” ही होत.१
     चिंतामण राव कोल्हटकर लिहितात की, ताजे-ए-वफा मधील वातावरण गेली शतकातील सामाजिक पार्श्वभूमीवरील होते. प्रमुख कथानकाला अस्तर म्हणून विनोद व संगीताचा विरंगुळा म्हणून ते उपकथानक होते ते एक म्हातारा व एक षोडष वर्षा मुग्धा यांच्यातील हास्य व कारुण्य अशा रसांच्या छटांनी नटलेल्या संवादावर बेतलेले होते. या मुग्धेचे नाव कमला होते. आणि कमळाची भूमिका दीनानाथ करत. तडफदार नखरेल गाणी आणि त्या जोडीला चित्तवेधक नटखट अभिनय यामुळे प्रेषक श्रोत्यावर दीनानाथांनी जबरदस्त मोहिनी पडली. दीनानाथांच्या तेजस्वी सुरेख चढया बाल आवाजातील अव्वल रागगदारी त्या उर्दू नाटकाच्या वातावरणात श्रोत्यांची मने हरवून टाकीत असे. प्यारा साहेबासारखे अवल दर्जाचे समजले जाणारे कलकत्त्यातील गवई मान तुटेपर्यंत माना डोलाऊ लागले. कलकत्त्यातील ताजे-ए-वफाच्या प्रयोगांना लोक थिएटरवर गर्दी करू लागले.२
     मराठी संगीत रंगभूमीवर  गझल कव्वाली हा संगीतातील अप्रचलितसंगीत प्रबंध प्रकार मा. दीनानाथाच्या गाण्यातून रंगमंचावर आला. या नाटकातल्या कमलेची व्यथा दीनानाथ गायक आणि नृत्यातील आदाकारीतून साकारत दीनानाथाच्या तेजस्वी सुरेल बाल आवजातून प्रतित होणारी रागदारी उर्फ नाटकाच्या वातावरणात श्रोत्यांची मने हरकून टाकत असे.३
संगीत मानापमान
संगीत मानापमान या नाटकातील दीनानाथानीकेलेली धैर्यधराची भूमिका:-

     १२ मार्च १९११ “संगीत मानापमान” या काकासाहेबांच्या पाहिल्याच संगीत नाटकांच्या प्रयोग मुंबईच्या वालिवाला थिएटरमध्ये झाला. यावेळी नानासाहेब जोगळेकर यांनी धैर्यधराची भूमिका करून आपल्या अभिनयाने आणि गायनाने प्रेक्षकांना भारावून टाकले होते. १९१८ च्या सप्टेंबर महिन्यात बलवंत संगीत मंडळीने हे नाटक मुंबई शहरात रंगभूमीवर आणले. त्यांनतर ९ वर्षानी मास्टर दीनानाथानी संगीत मानपमान या नाटकाचा प्रयोग सादर केला. या संगीत नाटकात त्यांनी धैर्यधरची भूमिका साकार केली.४ 
     मास्टर दीनानाथांनी त्यांच्या आवडीची तडफदार आणि आक्रमक भूमिका मिळाली. त्यांनी गंधर्व संगीत मंडळीची मानपमानाची चौकट स्वीकारली नाही.
     दीनानाथांच्या संगीत मांनापमान नाटकात केलेल्या कायापालटचे वर्णन त्यांचे चाहते उपेंदू चिंचोरे यांनी पुढील प्रमाणे केले आहे. ते लिहितात. वीर आणि शृंगाररसाने ओथंबलेल्या या नाटकाचे नाटकातील कालपरत्व लक्षात घेऊन दीनानाथांनी आपल्या वेशभूषेत संपूर्ण  बदल केला. पहिल्या अंकात एक लष्कर अधिकारी धैर्यधर, एका श्रीमंताची मुलगी पाहायला येतो तेव्हा लष्करी गणवेशात असणे शक्य नाही. दुसर्‍या अंकात छावणी भोवती चोरांचा धुमाकूळ असल्यामुळे धैर्याधराने लष्करी गणवेश वापरणे आवश्यकच होते. तिसर्‍या अंकात त्याला पृथ्वीधर महाराजांकडून तीन चोरांची सरदारी आणि पंचवीस लाखांची जहागिरी म्हणजे तो त्या पदाला साजेशा वेशात दिसायला हवा म्हणून दीनानाथांनी या तिन्ही वेळा धैर्यधराच्या पोषाखात  साजेसे बदल केले चिंचोरे यांच्या मते “मानापमान नाटकातील धैर्यधराची भूमिका करताना अमेरिकेतील रुडॉल्फव्हलीरिनो हा अभिनेता ज्याप्रमाणे पोशाख करीत तसाच पोशाख मास्टरदीनानाथ करीत”.५
मास्टरदीनानाथांची नाटकातील लतिकेची भूमिका:-

          सावनेर मुक्कामी कै. गुरुवर्य गडकर्‍यानी आपल्या आयुष्याच्या अखेरच्या काळात “भावबंध” लिहिले. बळवंत संगीत मंडळीला त्यांनी जिवंतपणी अभय दिले होते. ते आपले प्राण-दान  मृत्युला देता-देता शेवटी कै. गडकरी यांनी मृत्यू समयी शेवटची इच्छा बनून बळवंत संगीत मंडळीला एक प्रकारे संजीवनी दिली.
     मास्टर दीनानाथ व कोल्हटकर यांनी १८ ऑक्टोंबर १९१९ रोजी अकोला येथील श्रीराम नाट्यगृहात अकोल्यातील प्रेक्षकांनी ही छान स्वागत केले. बळवंत मंडळींनी छान तयार केलेलं हे नाटक अकोल्याच्या नाट्यगृहात आणले. त्यानंतर अमरावती, मलकापुर, जळगाव असा प्रयोगांचा प्रवास सुरू झाला.
     मास्टर दीनानाथांनी लतिकेची भूमिका आपल्या अमर अभिनयाने मराठी रंगभूमीवर चिरंजीवी केली. “भावबंध” या नाटकातील “कठीण कठीण किती कठीण ? या दीनानाथांच्या पदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असे.
     बळवंत नाट्यमंडळीने जून १९२० मध्ये पुण्यात भावबंध रंगभूमीवर आणले. त्यावेळी या “भावबंध” नाटकाची खुप प्रसिध्दी झाली. हे पाहुन ग.ना.तथा तात्यासाहेब परांजपे यांनी बळवंत नाट्य मंडळीचा हा मुक्काम मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या जीवनाचे मार्गदर्शक ठरले.६
     बडोदा येथे एकदा भावबंधांनाचा प्रयोग चालू होता आणि हा प्रयोग सयजीराव गायकवाड महाराजांनी ठेवला होता. प्रयोग रंगात आला असतानाचदुसर्‍या अंकामध्ये धुंडिराज- मालतीच्या प्रवेशाच्यावेळी अचानक वीज प्रवाह बंद पडला. थिएयटर्सचे अधिकारी आणि खाजगी कामगार घाबरून गेले होते. कारण महाराज काय म्हणतील याची त्यांना भीती वाटत होती. सयाजीराव नार्वेकर मुद्रेने नाटक पाहत होते. दोनच मिनिटे वीज बंद पडली होती. दिनकररावांनी प्रसंगावधान राखून तिसर्‍या अंकातील इंदुबिंदूच्या ओढताणीच्या प्रवेशाच्या वेळी प्रासंगिक विनोद निर्माण करत ते म्हणले “तुमच्या आगमनाने निर्जीव आरशांची भिंगे तडकतील, इतकेच काय, तुमच्या आगमनाने मघाचा विद्युत प्रवाह सुधा बंद पडला हा काया थोडा प्रभाव यावर सयाजीराव मनमुराद हसले.७
     भावबंधनाच्या यशस्वी प्रयोगांमुळे मध्यमवर्गीय सुशिक्षांना बळवंत नाट्यमंडळी बददल आपुलकी वाटू लागली. कंपनी सुरूवातीला लतिकेच्या भूमिकेसाठी कोट घेऊ शकली नव्हती. एका भगिनीने दुसर्‍या अंकानंतर स्वखुशीने स्वतचा कोट काढला आणि कंपनीस बहाल केला. तिसर्‍या अंकात हाच कोट लतिकेने म्हणजेच मास्टर दीनानाथांनी घातला. तो कोट देणारी ही रसिक भगिनी म्हणजेच थोर शिक्षणतज्ज्ञ ताराबाईमोडक होत्या.
     भावबंधबनाच्या प्रयोगासाठी बळवंतचा मुक्काम ऑक्टोंबर १९२० मध्येहैद्राबाद येथे होता. “भावबंधन”  पुस्तकासाठी दहा अकरा फोटो काढायचे होते. राजा दीनदयाळ या चित्रकारचा स्टुडिओ हैद्राबादेस होता. तो स्टुडिओ चालविण्यासाठी फोटोग्राफर देऊसकर यांनी घेतला होता. मास्टर दीनानाथ बाळकोवा गोखले, आणि चिंतामनराव कोल्हटकर अनुक्रमे लतिका, धनेश्वर, व घनश्याम या वेशभूशेत फोटोसाठी स्टुडिओत आले. दहा अकरा फोटो काढायचे पाच सहा तास लागतील म्हणून देऊस्करांनी त्या दिवशी इतर   गि-हाकांना फोटो स्टुडिओ बंद ठेवला. सगळी तयारी झाली. एवढ्यात देऊस्करांचे एक मोगलाई गि-हाईक बाहेरच्या पहारेकर्‍याला न जुमानता स्टुडिओत आले. लतिकेने ओवरकोट घातला होता. डोक्यावरुन स्कार्फ  घेतला होता. मास्टर दीनानाथांचे तेव्हाचे वय वीसवर्ष होते. स्त्री वेशभूषेत ते अगदी खुलून दिसत होते. त्या मियाँने एकदम कॅमेरा पर्यंत मजल मारली. त्याबरोबर हे तिघेही मेकअप रुममध्ये गेले देऊस्करांनी त्यांना परोपरीने समजावले तू स्त्री समजून स्टुडिओचा कब्जा घेतलास परंतु तो स्त्री नसून स्त्री वेषातील नट मास्टर दीनानाथ आहेत. हे मियाँला सांगितले तेव्हा खात्री पाटली इतके दीनानाथ हुबेहूब स्त्री पोषाखात हुबेहूब स्त्री दिसत.८
     सोलापूरच्या एका मुक्कामातभावबंधन पहाण्यासाठी लतिकेला दर्शकांचे चालक केशवराव भोसले आले होते. प्रयोग पाहून ते खूप खुश झाले. विशेषत: मास्टर दीनानथांवर त्यांनी प्रेमचा वर्षाव केला.
     अकोला, अकोट, अमरावती, मलकापुर, जळगाव, औरंगाबाद, पुणे, मुंबई, सोलापूर, वार्शी, पंढरपूर, मिराज, कोल्हापूर, नागपूर, वर्धा, चांदा, नाशिक, नगर, इतकेच नाहीतर भावबंधनाच्या या लतिकेने म्हणजेच मास्टर दीनानथांनी म-हाटी मुलुखा बाहेर हैद्राबाद,इंदोरअशा अन्य ठिकाणी सुरेल अशा गाण्याने लोकमान्यता मिळाली होती.९
     भावबंधांनातील दीनानाथांची लतिका एक अपुर्वाई होती त्याकाळी स्त्री शिक्षण नुकतेच वाढीस लागले होते. आणि सुशिक्षित शालीन बुध्दिमान स्त्री हा तरुण पिढीचा आदर्श होता. एक साधी भोळी रोमेंटिक वृत्ती त्या पिढीने जोपासायला सुरुवात केली होती. त्या आदर्शानुरूप अशी नायिका गडकर्‍यांनी “लतिकेच्या रूपाने साकार केली. त्याभूमिकेत दीनानाथ अगदी शोभून दिसत. दीनानाथांच्या लतिकेच्या या भूमिकेमुळे तरुण वर्ग अगदी भारावून गेला. आणि दीनानाथ या भूमिकेमुळे संगीत रंगभूमिकेच्या उच्च स्थानावर पोहोचले.१०

संगीत राजसंन्यास या नाटकातील शिवांगीची भूमिका:-

     इ.स. १९२२ च्या सुमारास “बळवंत”चा मुक्काम इंदूरला होता. “भावबंधन”नाटकाचा खास प्रयोग श्रीमंत सवाई तुकोजी महाराजांकरीता आयोजित केला होता. तुकोजी महाराज “भावबंधन” नाटकावर आणि सर्व कलाकारांवर खूप खुश झाले होते. “रामकवीचे दुसरे एखादे नवीन नाटक नाही का ? असे महाराजांनी विचारताच दीनानाथ म्हणाले “आहे ना , पण ते अपूर्ण आहे” तर मग जेवढे असेल तेवढे बसावा” राजआज्ञेचा हुकूम मिळाल्यावर “अपूर्ण राजहंसास” बसवायला सुरुवात झाली. या सं . अपूर्ण राजसंन्यासचा प्रयोग १९२२ मध्ये जून महिन्यात महाराजांसमोर सादर झाला आणि नाटकाचे दिग्दर्शक चिंतामणरावानी केले. संगीत मास्टरदीनानाथांनी दिले.११
     दीनानाथांच्या शिवांगीच्या भूमिकेने महाराष्ट्राला वेडच लावले दीनानाथांच्या मराठमोळ्या संगीतामुळे राजसंन्यास नाटकाने “नवा मनू’’ निर्माण केला. गडकर्‍यांची शिवांगी ही एक इतिहासकालीन मराठी मनाचे प्रतीक बनली. वि.ना.कोठीवाले म्हणतात मास्टरदीनानाथांनी शिवांगीची भूमिका करून “राजसंन्यास”या नाटकाचे जवळजवळ निम्मे यश पुनः स्वत: एकट्याकडे मालकी हक्काचे म्हणून महाराष्ट्र रसिकांकडून हिरावून घेतले.१२
     राजसंन्यास या नाटकात पाहता गडकर्‍यांनी भाषेचे आणि उर्वरित निम्मे यश शिवांगी या भूमिकेचे. शिवकलीन मराठमोळ्याची ही शिवांगी दिसायला शुभांगी, बोलायला उलमांगी, चालायला चतुरंगी, आणि बसून गाऊन करमणुकीला पवित्र वामांगी अशा प्रकारे गडकर्‍यांनी “राजसंन्यास”मध्ये शिवांगीची भूमिका लिहिली, आणि दीनानाथांनी ती हुबेहूब वाटवली.दीनानाथांनी “राजसंन्यास” या नाटकाद्वारे एक नवाच नमूना मराठी रंगभूमीवर निर्माण केला. दीनानाथांनी यातील पदांना लावणी ढंगाचे संगीत दिले. आणि दीनानाथांनी त्या लावण्या व नाट्यपदे, स्वर, लय, व भावप्रधानतेने प्रसंगाला अचूक अशी गाऊन लोकप्रिय केली.१३
     कोल्हापुरात राजाराम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या हट्टामुळे “राजसंन्यास”चा प्रयोग बळवंतने केला. मराठमोळ्या राजधानीतला हा प्रयोग अतिशय रंगला त्यावेळचे राजाराम कॉलेजचे प्राचार्य व सुप्रसिध्द शिवचरित्रकार डॉ. बाळकृष्ण आभार मानायला आले ते डोळ्यांतील अश्रु पुसतच चिंतामणराव कोल्हटकरांनी या प्रसंगाची आठवण लिहून ठेवली आहे.
     ते म्हणाले “क्षणभर असे वाटले. आपण शिवशाहीत वावरत आहोत. ही माणसे ते प्रसंग इतके जिवंत करीत आहेत की, ते पाहताना वर्तमानकालाचे आपणास विस्मरण पडत आहे. हे सुध्दा ध्यानात येत नाही. गडकर्‍यांची “शिवांगी” ही एक इतिहासकालीन मराठी मनाचे प्रतीक आहे. तिच्यावरून राज्ये ओवाळून टाकावीत. मी राजा असतो तर निम्मे राज्य शिवांगीला देऊन टाकले असते.१४


तळटीपा
1.  खंडेराव केळकर,! नाद ब्रम्ह” , वर्ष ७ , अंक २६ ऑक्टोबर २०००, पान न. ४८
2.  बाळ सामंत, “शुरा मी वंदिले”, पुरचुरे प्रकाशन, आवृती पहिली, ४ मे २०००, पान न. १९-२०
3.  वंदना रविंद्र घांगुर्डे, “ब्रीद तुझे जगी ” अनुबंध प्रकाशन, प्रथम आवृती, पान न. ४३
4.  बाळ सामंत, “शुरा मी वंदिले”, पुरचुरे प्रकाशन, आवृती पहिली, ४ मे २०००, पान न. ३१-३२
5.  कित्ता : पान न ३२
6.  ! नाद ब्रम्ह” , वर्ष ७ , अंक २६ ऑक्टोबर २०००, पान न. ३०
7.  कित्ता : पान न ३१
8.  कित्ता : पान न ३१
9.  कित्ता : पान न ३१
10 कित्ता : पान न ४९
11 वंदना रविंद्र घांगुर्डे, “ब्रीद तुझे जगी ” अनुबंध प्रकाशन,
प्रथम आवृती, पान न.८१
12 कित्ता : पान न ८१-८२
13 कित्ता : पान न ८२
14 कित्ता : पान न ८३











प्रकरण 4
संगीत क्षेत्रातील कामगिरी

दीनानाथांचे संगीत क्षेत्रातील पदार्पण:-

    बालगंधर्व यांचे रंगभूमीवरील गायन हा एक साक्षात्कार होता. तसाच मास्टर दीनानाथ यांचाही साक्षात्कार होता. दीनानाथांचे रूप काहीसे उग्र, काहीसे दक्षिणात्य, क्षात्रातेज देखणे व ठसठशीत होते तर तान वायुतत्वावर आधारलेली पूर्णपणे बाहेर फेकलेली, परिपूर्ण वेगवान विलक्षण जोशपूर्ण होते. दीनानाथांचा आवाज जोरकस होता या जोरकस फेकीमुळे दमखास केवळ जाणवे, एवढेच नव्हे, तर थक्क करी. बालगंधर्वच्या स्वरांना तंबोर्‍याची सार होती. तर दीनानाथांच्या  आवाजातून तंतांच्या अनुकरणाचा प्रत्यय येई. दीनानाथांचे गाणे, म्हणजे शक्ति आणि चमत्कृती होती. वीर, उदात्त,आदभूत शृंगार, हे रस दीनानाथ प्रकर्षाने साकारत.१
   “हे पार ब्रम्ह गोविंद नारायण गोपोल” ही दीनानाथांची अत्यंत आवडती चीज होती. ही एक प्रार्थना आहे. त्यात ईश्वराला म्हटले आहे की , मी तुला शरण आलेलो आहे. आणि माझे काही बरेवाईट करायचे आहे. ते तुझ्याच हातात आहे. तूच माझा पाठीराखा आहेस. ह्याच भूमिकेत मास्टर दीनानाथ संपूर्ण आयुष्य भर राहिले.
   मराठी रंगभूमेचे तीन प्रमुख मानकरी आहेत. त्यामध्ये बालगंधर्व, केशवराव भोसले,आणि तिसरे दीनानाथ ह्या तिघांच्या वयाच्या दृष्टीने आणि रंगभूमीवर पदार्पण करण्याबाबतीत मास्टर दीनानाथ हे सर्वात जुनिअर होते. बालगंधर्व म्हणत “मी व केशवराव भोसले रंगभूमीवर पाय रोवून असताना दीनानाथ आला आणि त्यांने स्वत:चे स्थान निर्माण केले, हयातच त्याचा मोठेपणा आहे” हे अगदी बरोबर आहे कारण बालगंधर्व आणि केशवराव भोसले अशा दोन श्रेष्ठ आणि दिग्गज गायक कलावंतांचा स्वत:वर परिणाम न होऊ देता एक वेगळेचा गाण निर्माण करून घडविणे  आणि गाणे लोकप्रिय करणे सोपी गोष्ट नव्हती.२
   दीनानाथांचे रूप, गाणे , स्वभाव, त्यांचे उच्चार सर्वच सर्वसाधारण कल्पनांच्या अपेक्षाच्या साच्या बाहेरचे होते. त्याच्या विजिगीषू, तडफदार, स्वातंत्र्यप्रिय, वृत्तीशी जमणार्‍या भूमिकांशी ते समरस होत आणि दीनानाथांच्या स्वभावाप्रमाणेच त्यांचे गाणे होते. ३
   दीनानाथ हे गोव्याचे म्हणजे श्री क्षेत्र मंगेश हे त्यांचे देवस्थान होते म्हणून त्यांचे आडनाव मंगेशकर. मंगेशीच्या पुढे दरवर्षी उत्सव होत त्या उत्सवात होतकरू तरुण मंडळींना नेहमी वाव मिळत असे व त्यातूनच कित्येक कलावंत पुढे येत. दीनानाथअशाच उत्सवातल्या रंगभूमीवरुन प्रथम पुढे आले. मडईकरांच्या मूळ नाटका अगोदर गणेशशारदा ह्यांचा छोटा प्रवेश असे त्या प्रवेशात शारदेच्या भूमिकेमध्ये दीनानाथ येत. “ब्रम्ह कुमारी पाव मला पाव” असे म्हणून कथ्थननृत्याचा तुकडा घेत आणि गिरकी मारून स्थिर होत.अशा प्रकारे दीनानाथ प्रथम रंगभूमीवर दिसले. त्यानंतर ते किर्लोस्कर संगीत नाटक मंडळीत गेले. बालगंधर्व त्यावेळी ही संस्था सोडून गेले होते. ते भरावयास एक तेजस्वी मुलगा त्यांना हवा होता. तो तेजस्वी मुलगा त्यांना मंगेशीला मिळाला. त्यावेळी किर्लोस्कर संस्थेत हिन्दी व उर्दू नाटके देखील होत असत. यातील ताज-ए-वफा ह्या नाटकात दीनानाथांनी कमलेची भूमिका केली यामध्ये “बालम सुरतीया तोरे देखन निंदिया जाय हे दीनानाथांचे गाणे लोकप्रिय झाले. ह्याच नाटकातील आणखी एक ठुमरी मिश्र रागातील “हयरे हाय जमाना तेरी चाल होती. ह्या पदाला वारंवार वन्स्मोर मिळत असे.४
   हयानंतर १९१८ मध्ये दीनानाथ किर्लोस्कर नाटक मंडलीतून बाहेर पडले. आणि स्वत:ची बळवंत संगीत नाटक मंडळी स्थापन केली व त्यांचे पहिले संगीत नाटक म्हणजे राम गणेश गडकर्‍यांचे “भावबंध” त्यात दीनानाथ लतिकेची भूमिका करत. ह्या नाटकातील “कठीण कठीण कठीण किती” हे पद लोकप्रिय झाले. दीनानाथांच्या आयुष्यात गाण्याचे जे चार टप्पे आहेत त्यातील पहिला टप्पा.
   हयानंतर वासुदेवशास्त्री खरे ह्यांचे उग्रमंगल ह्यात राणी पद्मावतीची भूमिका दीनानाथ करत. ह्या भूमिकेत ते एका प्रवेशात ठुमरी गाऊन कथ्थकनृत्य करीत ही ठुमरी पंजाबी स्वरांची होती. मराठी रंगभूमिवर पंजाबी बाज हा दीनानाथांमुळे प्रथम आला. रंगभूमीवर दीनानाथांमुळेच आले. ह्या दोन गोष्टी म्हणजे दीनानाथांनी मराठी रंगभूमीला दिलेली देणगी असेच म्हटले पाहिजे हा दीनानाथांच्या गाण्याचा दूसरा टप्पा.५
   त्यांच्या गाण्यातील चौथा टप्पा म्हणावायचा झाला तर मानापमान नाटकातील धैर्यधाराच्या भूमिकेतील “शुरा मी वंदिले” हे पद हे गाणे दीनानाथ अगदी समरसून गात हे गीत दीनानाथांनी स्वत:च्या ढंगाने म्हटले हे गीत पूर्वी नानासाहेब जोगळेकर किंवा केशवराव भोसले देखील गात असत परंतु रवी मी चंद्रकसा” हे गीत मात्र दीनानाथांनीच प्रथम मानापमानात म्हटले. मानापमान हे नाटक रंगभूमीवर प्रस्थापित झालेले होते. ते लोकप्रिय करायचे, तर त्यासाठी जबरदस्त धाडस चालीमध्ये नावीन्य आणणे त्यासाठी जबरदस्त धाडस दीनानाथांनी दाखवले. नाविन्य आणण्यासाठी त्या प्रसंगाला अधिक उठाव कसा येईल याचा विचार दीनानाथांनी केला.
    उदाहरणार्थ:- “चंद्रिका ही जणू” हे पद प्रथम त्रितालात होते. ते दीनानाथांनी रूपकामध्ये केले. त्यामुळे त्याची रंजकता वाढली थिरकवाँसारखे अव्वल दर्जाचे तबला वादक दीनानाथांनी केलेले हे बदल ऐकण्यासाठी मुदाम येत असत. “दे हात शरणागता” ह्या पडत पूर्वी आलापी होती दीनानाथांनी केलेला बदल म्हणजे ती आलापी काढून टाकली प्रेमसेवा शरण हे गीत पूर्वी भीमपलास मध्ये गात असत. ह्या पदामधील समर्पणाची भावना दीनानाथ उत्कतेने म्हणत. तीव्र माध्यमातून दीनानाथ हयांचे प्रत्यंतर आणून देत. तेव्हा हा केलेला बदल योग्य आहे याची खात्री पटते.६
   दीनानाथांनी फक्त चालीमध्ये स्वरच्या तर्‍हेनेच बदल केले असे नव्हे तर कित्येक ठिकाणी लयीमध्ये देखील बदल केले. रणदुंदुभी नाटकतील “आपदा राज्यपदा भयदा”हे गाण राक्षसी महत्वाकांक्षा ह्या नाटकातील “देवता कामुकता रहिता” हे दादर्‍यात घेतले. त्यामुळे पद म्हणण्यास सुलभ झाले.७
   “शुरा मी वंदिले” या पदाची दीनानाथांनी पारंपरिक चाल बदलून “बडहंस सारंग: रागत लावली. मूळ चालीत “तीव्र मध्यमाचा” हा स्वर नव्हता. दीनानाथांनी त्यांच्या चालीत तीव्र मध्यमाचा  वापर केला त्यामुळे शुर सेनापतीचा कणखरपणा अधोरेखित होतानाच पदातील भावनेनुसार विनम्र भावनाही जास्त उठावदार झाली. दीनानाथ गाताना “शुरा” याशब्दावर विशेष स्वर विलाप करीत. साध्या भारदस्त आलापीने खास दीनानाथी शैलीत शब्दांचे भावपूर्ण उच्चारण आणि त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण गायकीमुळे हे पद अधिक लोकप्रिय झाले आणि मानापमानात मानबिंदू ठरले.८
   दीनानाथ बुध्दिमान होतेच तसेच जिद्दीही होते. तेजस्वी होते. त्यांचे गाण्यावर प्रेम होते. ते एकाएका स्वरला देवता मानत. तंबोरा हा एक साधू पुरुष आहे असे ते म्हणत स्वरासाठी गाण्यातल्या वेगवेगळ्या ढंगासाठी, प्रकारासाठी रम्य स्वरकल्पनांनी नटलेल्या चिजांसाठी, सुमारे १०वर्ष दीनानाथांनी अगदी ध्यास घेतला होता. त्यांच्यापाशी पाच हजार चिजांचा संग्रह होता. नेहमीच्या रागारागिण्या होत्याच पण हेम, खेम, डाकिनी, गोधुनी,मालवी, राजनट, शंकरा बिहाग, फुलश्री, सागर, बरवा केदार,जलधर केदार, छाया, बडहंस या सारखी अनेक वैचित्य पूर्ण राग स्वरूपे त्यांनी गोळा केली होती. पंजाबी पुरब, कर्नाटकी, राजस्थानी-बाजारातील मर्म त्यांनी रिचवले होते. भरपूर दैवीगुण, भरपूर ज्ञान, भरपूर मेहनत, आणि भरपूर स्वतंत्र विचार हे दीनानाथांचे वैशिष्ट्य होते. तरल सौदर्यादृष्टी निबंधना पलीकडे जीवनाची हौस असल्याने ते प्रयोगशील झाले. सृजनशीलता आणि निर्भयता गुणांमध्ये त्यांचे गाणे, तडफदार, चमत्कृती रम्य व बलवंत झाले. कालचे शुरा मी वंदिले आज नसे. दीनानाथांच्या जवळ संगीताची भावचित्रे काढायला कॅनव्हासखूप मोठे होते. दिव्य स्वातंत्र्य” हेच दीनानाथांच्या रंगभूमीवरील व रंगभूमीबाहेरील गाण्याचे स्वरूप होते.९
   दीनानाथांनी त्या काळात आकाशवाणी मुंबई केंद्रावरील थेट प्रक्षेपण कार्यक्रमात अनेक अनवत राग सादर केले. एकदा आकाशवाणीत दीनानाथांनी मलुहा केदार राग गायला. हा राग ऐकून आकाशवाणीचे दर्दी अधिकारी बुखारीसाहेब आपल्या खोलीतून दीनानाथांला भेटायला लगेचच आले. दीनानाथांना त्यांनी आनंदाने मिठी मारली आणि म्हणाले. “वा ! दीनानाथ वा! क्याबात है ! बहुत अच्छे ! वा! वा! वा!
   दीनानाथ मनस्वी होते. रागरूपला घेऊन फार काळ गायन करणे त्यांना रुचत नसे. म्हणून राग गायनात तिरोभाव अविर्भाव यांचा विपुल वापर असलेल्या स्वर संगती त्याच्या गायनात सहजच येत. दीनानाथांकडे अनवत रागरूपांचा मोठा भरणा होता. उत्कृष्ट ग्रहणशक्तीमुळे ते एकदा  ऐकून बंदिश आत्मसात करीत असत. स्वतंत्र प्रतिभेमुळे तीच बंदिश अत्यंत रंजकपणे मांडत असत.१०
   काही बुजुर्ग खानदानी उस्तदांनाच माहीत असतील अशी अनवत रागरूपे त्यांच्या संग्रहात होती. उदाहरणार्थ:- दोन्ही धैवत असलेला “भैरव बहार” कोमल निषादाचा वापर असलेला “शुध्द सारंग” दोन्ही रिषभाचा “पुरिया कल्याण” “फलश्री सुंदरकली” राजवट इत्यादी ही नावे आजही कोणाला फारशी माहीत नाहीत.११
   मास्टर दीनानाथ गात असलेली काही शास्त्रीय अनवत रागरूपे
यमन:-  यमन किंवा कल्याण हा प्राचीन राग आहे. असे असले तरी प्राचीन कल्याण रागाचे स्वरूप वेगळे आहे. प्राचीन भारतीय संगीतात तीव्र माध्यम अल्प किंवा वर्ज्य होता. कल्याण रागालाच आजकाल यमन राग म्हणतात.
१बंदिश:-   
     “!!मनदल बाजो रे बाजो, बाजो बाजो रे और घनाई!!
     धन धन भाग सुहाग की रात मंगल घडी आयी!!”
दीनानाथांच्या यमन रागाच्या बंदिशीत हेच प्राचीन दुर्मिळ रूप दिसते. आता सध्या दोन मध्यमाचे यमन कल्याणहे रूप प्रचलित आहे. दीनानाथांनी गायलेल्या बंदिशीत याप्रमाणेच प्राचीन शुध्द मध्यम असलेले तीव्र मध्यम अल्प असलेले निरेग, परेसा अशा संगती असलेले दुर्मिळ रूप पाहावयास मिळते. मनदल बाजोरे ही बंदिश ते रूपक तालात गात असत. याचे साधारण चलन:-
नी सा रे सा नी, रे सा नी धी प सा ! सा  ऽ ध नी रे ऽ सा ! नी रे ग, म  ग रे ग रे,ग ग प नी ध प ऽ, ग प ऽ रे ऽ सा ! प प ध नी सा ऽ सां, नी रे सां नी ध नी ऽ ध प , ग प रे सा, सा रे ग ऽ ग, नी ध प,  ग प ऽ रे सा ऽ नी ! १२
२  संपूर्ण शंकरा
     मास्टर दीनानाथांच्या मनात मंगेशीच्या मंगेशाची भक्ति होते. त्याच प्रमाणे त्याच शंकर या दैवताचा शंकरा हा राग त्यांना प्रिय होता. संपूर्ण शंकरा हा अप्रचलित राग शंकराप्रमाणेच आहे, पण तार सप्तकात क्वचित शुध्द मध्यम ही घेतला जातो. त्यामुळे षाडव वर्गाचा हा राग संपूर्ण शंकरा होतो. प्रचलित शंकरा रागात दीनानाथांनी शंकरा भंडारी भोले या बंदिशीची रेकॉर्ड दिली आहे. संपूर्ण शंकरा रागात तुरकवा सन व त्याला जोडून तू आन बान बेली ही बंदिश द्रुत एकतालात गात. या द्रुत बंदिशीवर आधारित स. न्यस्तखडग या नाटकात तो वणवा बघ दूरी हे पद गौतम बुध्दाच्या तोंडी घातले आहे. सून मोरे सैंय्या या स्थायीतल्या शब्दावर विविध फिरत घेऊन खास दीनानाथी शैलीत त्या जागा घेतलेल्या दिसतात. तुमरे कारन या शब्दावर शुध्द मध्यम स्वर तार सप्तकात घेतला आहे.
          बंदिश:-
               तुरकवा सन मन लागी लाला
          इतनी जो अत सुन मोरे सैंय्या !
               सुन लीनो कलमा सुन लीनो बानी
               हमरे कारन बार डारा निस्तार” !! १३
३  शंकरा बिहाग:-
     मास्टर दीनानाथ शंकरा बिहाग या नावाने गात असलेले हे रांगरूप किंवा बंदिश अन्यत्र सापडत नाहीत. रागाचे स्वरूप कल्याण थाटावर आधारित आहे. या रागातील पारब्रम्ह गोविंद नारायण ही बंदिश रुपक तालात आहे या रागाचे चलन :-
रे नी ध प सा ऽ सा ! सा रे ग म  रे सा रे s सा , रे s प ध प रे ग रे, (प) मग रेसा ! नी नी सा रेगरेसा, रे नी ध प सा ! ग प सां s सां, सां नी रे सा, प सा प ग, ग ग, नी ध प, ग ग रे सा! रे प ध ग, ग प रे सा !
     बंदिश:- “ परब्रम्ह गोविंद नारायण गोपाल जगत गुरु पूजन तरे हरे!!
     उगतत जुगतत गोपाल हरगुरू नायक गोवरधन उध्दारन शरन परे!!”
     या रागाचे चलन पाहता यामध्ये शंकरा आणि बिहाग पूर्ण स्पष्ट नाहीत. तसेच यमन, यमनकल्यान, हंसध्वनी या अन्य कल्याण थाटावर आधारित रागांचा छटा दिसतात. विस्तारात तीव्र माध्यमाचा वापर कमी आहे.१४
४   शुध्द बिलावत:-
शुध्द बिलावंत ची मास्टर दीनानाथांची संकल्पना म्हणजे कोमल निषाद वर्जित अल्हैय्या बिलाबल परंतु या बंदिशीत अल्प कोमल निषाद दिसतो.तसेच सा नी ध नी  रे , ग प ग सा ध सा ! असे यमन व भूप रागाचे तिरोभाव दिसतात. दीनानाथ गाताना स्वर तालाशी मन:पूत क्रीडा करीत असत.  तसेच शब्दही शब्दांचे उच्चारण एकसारखे नसे. ते शब्द नादात्मक असेऊन वेगवेगळ्या प्रकारे ते गात असत.
बंदिश:-
     “पीतन कीजिये कुमित सो, दिन घटत जात तनते!
     मुखी मौसम जियाकी औरन सो,अरे भलाई कौन गाव की रीत तनते!!”
     ब्रम्हकुमारी नाटकातील सुफलित होते विधिलेखी हे वा.ना. देशपांडे यांचे पद या बंदिशीवर आधारीत आहे.१५
५  फुलश्री;-
     हा राग मारावा थाटाचा आहे. अन्यत्र या रागाचे नाव एकू येत नाही. या रागाच्या नावात श्री असले तरी श्री रागाचे अंग ठळक दिसत नाही. पण श्री वाचक सा प संगती घेतली आहे. या रागाचे स्वर पुरीया कल्याणरागाप्रमाणे आहेत. तसेच शुध्द मध्यम एका विशिष्ट रीतीने घेतलेला आहे या रागाचे चलन:-
     सा s सा प s , मे ध नी ध प, प म प, ग म प s म ग, सा ग म धा म ग, सा ! सा s नी ध, म ध सां s सां, सां रे नी s , रे ग रे सां, ध नी s s नी s s , प म प , ग म प s, मग, सा ग म ध म ग सा! या रागाच्या विस्तारात पूरिया, सोहनी, मारावा बिहार, कल्याण या रांगांच्या छ्टा दिसतात.
बंदिश:-
     “अलबेली तू घुघंट खोल, तेरे घुघंट मे चंद्र बिराजे!!
     करत झपट उनके संग मीलन को एक बार मुसे बोल!!”१६

६  बहुहंस सारंग:-
     सध्या बडहंस सारंग या रागाचे दोन प्रकर प्रचारात दिसतात. प्रकार पहिला –वृंदावनी सारंगात मधमाद सारंगाप्रमाणे मुक्त मध्यम घेणे किंवा दोन निषादांचा मधमाद असे त्याचे स्वरूप आहे. दुसर्‍या प्रकारात शुध्द गंधार , धैवत घेतात. – नी सा रे म प नी सां ! सां नी ध, नी प, म ग म प म रे नी सा!
     मास्टर दीनानाथांचा बडहंस सारंग या दोन्ही प्रकाराहून वेगळा आहे. राग शुध्द सारंगात गंधार स्वराचा उपयोग आसेही, अवरोह वक्र असा विशिष्ट पद्धतीने घेऊन हा राग ते सादर करीत आहेत. मोरवा करे झिंगार या त्यांच्या बंदिशीत ते शब्दावर क्रीडा करत.कल बन फुले,हरियाली या ओळीवर त्यांचा अभिनय ही पाहण्यासारखा असे. ते हे शब्द विविध त-हेने उच्चारीत हरियाली शब्दावर कधी स्वरांचे हिंदोळे घेताना तर कधी आरोही अवरोही कंपित गमकयुक्त खास दीनानाथी तान घेत. या रागाचे चलन –
नी सा रे म s रे (सा )नी, सा, रे ग रे सा s नी ध प नी नी सा! सा s रे गरे सा नी . सा रे सा नी ध प , रे म s s s, पधनी सां नी ध प s. म प ss रे सा, रे म रे, म प म प, ध प म s रे सा s नी  !
     याच रागातील आये हो सैय्याँ ना या बंदिशीवरून दीनानाथांनी शुरा मी वंदिले हे पद गायिले आहे. या मानापमान नाटकातील ही दीनानाथ प्राणित चाल आजही लोकप्रिय आहे.
     बंदिश-
     “मोरवा करे झिंगर, सकल बनफुल हरियाली!
     भूल गई हू सुधबूध लीनी करके कोयलिया पुकार!!”
७ मलुहा केदार:-
     मलुहा केदार रागात मंद्र मध्यमावर न्यास आहे. तसेच या रागातील गंधार कमोद अंगाने वक्र येतो. मास्टर दीनानाथ गाताना या शुध्द गंधाराचा वापर छान करीत असत. राग नियमांना थोडीसी बगल देऊन केलेला शुद्ध गंधाराचा निगारेग, गरेसा असा सरळ वापर, मंद्र मध्यम टी शुध्द मध्यम मौंदर बाजे या बंदिशितील बाजे या शब्दावर  घेतलेली मींड कंपित गमक व बेहळव्याने युक्त अशी आलापी यामुळे मास्टर दीनानाथांचा मलुहा केदार अत्यंत वेगळा वाटत असे. या रागात सध्या प्रचलित असलेली आजरा मोराही ख्यालाची बंदिश ते द्रुत तीन तालात गात असत. आजरा मोरा ही बंदिश त्यांनी उस्ताद विलायत हुसेन खाँ यांच्याकडून प्राप्त केली होती. मास्टर दीनानाथांच्या संगीत प्रेमापायी विलायत हुसेन खाँ अनेकदा बळवंतच्या नाट्य प्रयोगास येत असत. अशी आठवण गणपतराव सागतात. क्वचित थारा गुन मांनुगी ही बंदिश गात हा राग त्यांचा अत्यंत आवडता होता. आकाशवाणी मुंबईतील मलुहा केदारच्या थेट प्रेक्षपणाला तत्कालीन आकाशवाणी अधिकारी झेड ए बुखारी यांनी भरभरून दाद दिली होती.
बंदिश:-
     रे मौंदर बाजे कडीये अज एक न बात न पुछो
     मोमदशा पियामन की बात न पुछे सदारंग धर काजो रे”१८
८  खेम कल्याण:-
     मास्टर दीनानाथ गात सलेल्या खेम कल्याण रागाचे स्वरूप अत्यंत वेगळे होते. ते सध्या प्रचलित असलेल्या कोणत्याही प्रकारे खेम कल्याण रागाशी जुळत नाही. मास्टर दीनानाथ जे या रागाचे रूप गात त्यांच्याशी थोडासा मिळता जुळता प्रदीपकी हा राग सध्या प्रचारात आहे मास्टर दीनानाथांच्या खेम कल्याण च्या रूपात दोन गंधार दोन नीषाद आणि कोमल धैवत घेतलेला दिसतो. १९
९  पूर्वी :-
     पूर्वी हा आत्ताच्या शास्त्रीय संगीतातील प्रचलित आणिलोकप्रिय राग आहे . प म ग म ग ,रे म ग ,म ग रे सा ,असे त्याचे स्वरूप असून मास्टर
दीनानाथ राग गाताना तीव्र मध्यमाला घेऊन विविध स्वरावली घेत.
१०  सोहनी बहार:-        
     या रागाच्या नावाप्रामाणे सोहनी आणि बहार या रागाचे मिश्रण आहे. या रागाच्या चीजेत तराव्याचे शब्द आहेत. ही बंदिश मास्टर दीनानाथ धमार तालात गात असत.
११  छाया:- (रागिणी)
     छाया ही छोटी रागिनी धुन स्वरुपात असून दीनानाथ नेहमीच्या मेहनतीसाठी रियाजात गात. शुध्द छाया या नावाने एक राग अन्यत्र क्वचित एकण्यात येतो की, ज्यामध्ये कोमल निषाद गाळून छाया नट असे याचे रूप आहे. त्यापासून हा वेगळा राग आहे. या रागात मांड, यमन, भूप, हंसध्वनी या रागाच्या छटा दिसतात.
     नाद ब्रम्हतील मंगेशकर या अंकामध्ये मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या गायन शेळीची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे सांगितली आहेत.
मास्टर दीनानाथ यांच्या गायन शैलीची वैशिष्ट्ये
1)  स्वरफेक व स्वरताल- स्वरफेक करताना गायाकीमध्ये शब्दौच्चारांमध्ये विलक्षण स्फुरण व उत्स्फूर्तता जाणवते.
2)  अत्यंत सहजता- वेगवेगळे स्वरबंद  लायबंधातून निर्माण करताना सौदर्यशोधनातून ते स्वर निर्मिती शैली घडवित गेले.
3)  आक्रमकता- आत्मविश्वासाशिवाय आक्रमकता येत नाही. आत्म विश्वास त्यांच्या स्वरातील स्थायीभाव होता. स्वरातील ताकद भव्यतेची प्रचीत देऊन जाई.
4)   विविध स्वर अलंकार- पूर्णत्वाची ओढ असलेली त्यांची गायन शैली आळपी तान याबरोबरच मिंद्र गमक, हरकती, मुरल्या, या स्वर अलंकाराचा शब्दाच्या अर्थानुरूप असा सुयोग उपयोग करीत तेव्हा अनोखी सौदार्यस्थळ म्हणता येई.
5)  वेगवान गायन शैली- वेगवान स्वरफेक हे त्यांच्या गायकीचे केंद्रस्थानी असलेले सौदार्यस्थळ होय असे म्हटले पाहिजे.
6)  प्रथपित स्वर रचनामध्ये स्वर निर्मिती- सौदारी प्रिय दीनानाथ यांनी आपल्या गायन शैलीचा शोध घेताना प्रस्थापिचलीमध्ये बदल केले. त्यांचे स्वागतही झाले. आणि टीकाही झाली. त्यांनी जे नव केल. त्यापाठीमागे शास्त्रीय संगीताची स्वर निर्मिती होती.
7)  चमत्कृती- गायकी मांडताना स्वर वाक्यात चमत्कृती करण्याची वेगळी दृष्टी आढळते यासाठी अचाट कल्पनाशक्तीची जोड असावी लागते ती होतीच, याशिवाय फिरत असलेला गळा लाभलेला होता. त्यामुळे गायकीत सहज अशी स्वाभाविकता येई.
     गायन शैलीतला समतोल - गायकीतील तोल सांभाळण्याविषयी दीनानाथांनी मौलिक विचार व्यक्त केले आहेत.२०
     मास्टर दीनानाथांयांनी स्मृती दर्शन या पुस्तकात लिहिलेला संगीत शास्त्रावरील ग्रंथ यामध्ये सप्तस्वर कसा होतो. नाद कसा उत्पन्न होतो. कल्याण थाटातील १३ राग सांगितले आहेत. ते पुढील प्रमाणे:-
१)    यमन, २) शुध्द कल्याण, ३) भूपाळी, ४) हमीर, ५) केदार, ६) छायानट
७) कोमाद, ८) श्याम , ९)  हिंदोळा, १०) गौड सारंग, ११) मालश्री,
१२) यामनी १३) च्ंद्रकांत हे राग सांगितले आहेत.   
     सैधवी बंगाल, सोरटी, भोपाली, गुर्जरी, मालवी, कामोदी, कर्नाटी, गंधारी टंकी, वैराट, हमीर, शंकर भरण,या थाटात सागीताला आहे. षडज ऋषभ , गांधार, मध्यम, पंचम धैवत, निषाद यापैकी स्वरांचे प्रत्येकी, कोमल आणि तीव्र असे दोन भेद आहेत. बाकी षडज ए पंचम हे स्वर दोन अचल आहेत. म्हणजेच त्यांना कोलम किंवा तीव्र भेद नाहीत. वर लिहिलेली स्वराची नावे चीजा वगैरे गाताना सुलभरीतीने उच्चारतांना येऊन स्वर देखील ओळखता यावे म्हणून प्रत्येक स्वरांवर नावाचे आद्याक्षर घेऊन गायनांत त्यांचा उपयोग करताना ती नावे सांगितली आहेत.
     गीत प्रकरण पाहताना यामध्ये गीत म्हणजे चीज ही स्वर ताल, आणि शब्द मिळून होतो चीजांचे प्रकार त्यामध्ये ध्रुपद, ख्याल सदारंग व अदारंग, त्रिपट ठुंबरी, चतुरंग, होरी, सारीगम या चीजा बददल माहिती दिली आहे.२२
     दीनानाथच गाण म्हणजे आकरमकता किंवा तोडफोड करणार गाण अशी काही लोकांची समजूत आहे. दीनानाथांचा त्यांच्या तानेमधील जोरकसपणा हा स्वाभाविक होता. बालगंधर्वाचे गाणे हे स्त्री प्रवृत्ती दर्शक तर दीनानाथांचे गाणे हे पुरुष प्रकृती दर्शक आहे. बालगंधर्वाच्या गाण्यात लाघवी प्रीती भक्ति, हे अतिशय मधुर असत तर दीनानाथांच्या गाण्यात स्वरांना तीक्ष्णपणा,  टोकदारपणा होता. त्यामुळे त्यांच्या गाण्यात विररस, अदभूत भाव आढळतो. बालगंधर्वाचे गाणे व दीनानाथांचे गाणे ह्या एकाच गाण्यात एक स्वतंत्र विचार, स्वतंत्र ताकद होती. चिंतामणराव कोल्हटकर म्हणतात की, दीनानाथांच्या गाण्यातील कित्येक पैलू लोकांसमोर आलेच नाहीत.२३


दीनानाथांचे ध्वनीमुद्रित गायन
दीनानाथांचे ध्वनीमुद्रित गायन याबाबत  ! नादब्रम्ह २००० ऑक्टोंबरच्या ( मासिकात ) अंकात सांगितले आहे. 
दीनानाथ मंगेशकरांनी बेचाळीस वर्षाच्या आयुष्यात बळवंत संगीत मंडलीची स्थापना केली, आणि मराठी रंगभूमीवर आपला ठसा उमठवला. मास्टर दीनानाथ मंगेशकरांनी पंचवीस ग्रामोफोन रेकॉर्डसवर पन्नास गाणी मुद्रित करून ठेवली आहेत. त्यांनी गाजवलेली नाटके पडद्याआड असून ती पाहिलेली मंडळी व त्यांचं गान प्रत्यक्ष ऐकलेली माणसं दिवसेदिवस संख्येने कमी होत असल्याने त्यांच्या आवाजाविषयी जी काही माहिती आहे ती ! या  अंकात (सुरेश चांदवणकर, मुंबई ) यांनी या विषयी माहिती दिली आहे.
हिज मास्टर्स वॉइस (HMV), तिचीच शाखा (The Twin) व शांतारामबापुच्या पुढकरांने स्थापन झालेल्या यंग इंडिया रेकॉर्ड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी तर्फे १९३१-१९३७ या कलावधीत मास्टर दीनानाथांच्या ध्वनिमुद्रिका निघाल्या व बाजारात विक्रीला आल्या. मास्टर दीनानाथ अगोदर किमान दहा  वर्षे म्हणजेच १९२० च्या दरम्यान बालगंधर्व व केशवराव भोसले  यांच्या रेकॉर्डस निघाल्या होत्या. १९२६ च्या दरम्यान कार्बन मायक्रोफोनेस आले आणि electrical recording ला सुरुवात झाली.त्यावेळी वझेबुवा, बालगंधर्व, तसेच मास्टर दीनानाथमंगेशकर यांच्या ध्वनिमुद्रणाना याचा लाभ झाला. या मध्ये मानापमान, पुण्याप्रभाव,रंणदुंदुभि, उग्रामंगळ, भावबंधन, सौभद्र, सन्यस्त खड्ग इत्यादी नाटकातील गाजलेली पदे आहेत. त्याचप्रमाणे दरबारी, वसंत, तोडी,  बंडहंस अशा रगदारी संगीताच्या ध्वनीमुद्रिकापण त्यांनी दिल्या आहेत. मराठी ,हिन्दी (उर्दू ), बरोबर कानडीमधील गाणी पण त्यांनी गायली आहेत.
एच.एम.व्ही. कंपनीतील त्यांच्या पहिल्या रेकॉर्डिंगची काही हकीकत  (१९३०) या अंकात नमूद केली आहे.
सोलापूर का नगरहून रात्रीप्रवास करून दीनानाथ कांडेवाडीतील शांताराम मांजरेकर यांच्या घरी सकाळी आले. काळ्या काडीचे धोतर, ओपन कोलरचा शर्ट, कोट नि डोक्यावर पांढरी कडक आणि डावीकडे कललेली टोपी असा पोशाख होता. शांताराम ते त्यांचे बालमित्र-गाण्याची त्यांना उत्तम जाण होती. पेटीवर उत्तम हात असलेले. त्यांना पेटी काढायला सांगून, पेटी ट्यून केलेली. सुरेल स्थितीत आहे याची खात्री करून घेतली. एक-दोन पदे म्हणून दीनानाथांनी अंदाज घेतला. कुठे? कशासाठी? हे काहीही न सांगता. “पेटी तंबोरा घेऊन माझ्याबरोबर चला असे सांगितले आणि ते रॅम्पार्त रोडवर एच.एम.व्ही. मध्ये पोहोचले.२४
     दीनानाथांनी नेहमीच्या चढया सूरत गाण्यास सुरुवात केली. परंतु गाण्यातल्या हलक्या “जागा” नीट येईनात. शेवटी दीनानाथांचा एक सुर कमी करणे भाग पडले. त्यानंतर सर्व सुसूत्रे झाले होते. दीनानाथांनी मुद्रित केलेले पहिले पद “रवि मी, चंद्र कसा” हे होते. साडेबारापर्यंत तर पुढे बोरकरांनी साथ केली., आणि त्यानंतर दीनानाथ मंगेशकरांनी सकाळच्या गाडीने नागपूरला निघून गेले अशा प्रकारे दीनानाथांच्या रेकॉर्डसची हकीकत सांगितली आहे.
     दीनानाथ गात असताना आवाजाच्या स्त्रोताने रेकॉर्डिंगची सुई मेणाच्या तबकडीत (वॅक्समध्ये) सारखी रुजू लागली होती. माईक दूर ठेवला तर गाण्यातल्या हलक्या जागा नीट येत नव्हत्या. त्यामुळे त्यांना एकसूर कमी करावा लागला. १९३१-३२ मध्ये असणार्‍या सर्वच गाण्यामध्ये अतिशय जोरकासपणा व आक्रमकता ऐकताना ही जाणवते. बळवंतचा उत्कर्ष काळ म्हणावा लागेल. १९३७ चं Twin व यंग इंडियावरच रेकॉर्डिंग मात्र अधिक परिणामकारक, वेयानेतून निघल्यासारख व काळीज हेलावून सोडणार वाटत.२५
     दीनानाथांच्या मृत्यूनंतर ही त्यांच्या स्मृती सतत जागत आहे. त्यांचे कृष्णार्जुन युध्द” सारखे बोलपट प्रयत्नपूर्वक मिळवून जतन करून ठेवलेले आहे.. ध्वनिमुद्रिकांचा प्रकाशन काल, प्रत्येक गाण्याच मिनिट सेकंदातील कालावधी यांची नोंद सीडीज / कॅसेटसच्या वेष्टना होणे गरुरीचे आहे.
     मास्टर दीनानाथ मंगेशकरांच्या ध्वनिमुद्रिका येथे सांगितल्या आहेत.
1   एच.एम व्ही. हिज मास्टर्स वॉइस (HMV) दहा इंच व्यासाच्या  ७८ गतीच्या रेकॉर्डस-पी मालिका- काळे लेबल / प्रकाशन काल १९३१-३२ किंमत प्रत्येकी रुपये ३-८ फक्त.

     मास्टर दीनानाथ मंगेशकरांच्या पी. मालिकेतील रेकॉर्डस १९३१मध्ये बाजारात विक्रीला आल्या त्याची माहिती ग्रामोफोन कंपनीच्या कॅटलॉग्जमध्ये पाहाला मिळते. ती माहिती पुढील प्रमाणे दिली आहे.
१.         फ्रेब्रुवारी १९३१
     पी. १३४५२ कठीण कठीण कठीण किती (यमन) नैन सौ नैन मिला रखो रे (दरबारी)- भावबंधन
      गायन कलेच्या क्षेत्रात व उपासकामध्ये मास्टर दीनानाथ यांचे नाव अमर करण्यासाठीची त्यांची दणदणीत गायनपध्दती आहे. अशा टीकाकरणार्‍या माणसाचे शब्द दीनानाथाच्या सहज निघणार्‍या गाण्याच्या वर्षावाने विरुन प्रशंसाकरणारेशब्द निघतील अशी आहे.
२.            जून १९३१
पी. १३४९८ आजवरी पाहुनि जिवलगा-(लावण) राजसंन्यास, भाव भला भजकाचा-(देशी आसावरी- उग्रमंगल)
      मास्टर दीनानाथ स्त्री भूमिका खूपच छान करत. यांची गायन शैली जोरकस आणि भरदार आहे. उग्रमंगल नाटकातील “भाव भजकाचा हे पद देशी आसावरी रागात आहे तर दुसरे पद राजसंन्यास नाटकातील आजवरी पाहूनि वाट जिवलगा लावणी थाटाचे आहे. एक पद गवई थाटाचे तर दुसरे शाहीरी चालीचे आहे.
३.            ऑगस्ट १९३१
पी. १३५१६ नाचत ना गगनात नाथा-(कवाली)पुण्यप्रभाव सहेली मन दारुडा  - राग पहाडी, ताल दादरा
      राम गणेश गडकरी  हे नाटककार आणि पुण्यप्रभाव या त्यांच्या नाटकातील कवाली आहे.ल सहेली मन दारुडी ही मास्तरांची स्पेशल चीज आहे. त्यातील अवधडपण सफाईदार तान पध्दती आणि गळ्याची फिरकत रसिकांना वेड  लावणारी आहे.२७
४.       ऑक्टोबर १९३१
     पी. १३५ साजणी बाई (कवाली) राजसंन्यास सुखी साधना – देसकार –      त्रेताल देशकंटक
          राजसंन्यास नाटकातील साजणीबाई ही कवाली थाटाची      लावणी नव्या नवलाईने म्हटली आहे तर सुखी साधना मना सोडिना हे पद देशकार रागात आणि कर्नाटकी पध्दतीवर म्हटलेले आहे.
2   एच.एम व्ही. (HMV) एन मालिकेतील ध्वनिमुद्रिका (लाललेबल 10”व्यास ) ७८ गतीच्या दोन्ही बाजूस गाणे असलेल्या लाखेच्या ध्वनिमुद्रिका प्रकाशन काल १९३२ किंमत २-१२ प्रत्येकी.


3    The Twin कंपनीच्या पिवळ्या लेबलच्या १० व्यासाच्या व ७८ ध्वनिमुद्रिका प्रकाशन काल १९३९



4   यंग इंडिया रेकॉर्ड मॅन्यु कंपनीच्या रंगीत लेबलच्या १० इंच व्यासाच्या ७८ गतीच्या दोन्ही बाजूस गाणे असलेल्या ध्वनिमुद्रिका किंमत १-१२ प्रकाशन काल १९३७
                                                          २९
तळटीपा
१.    प्रभाकर जठार, स्वर सौहार्द, पहिली आवृती, पॉप्युलर प्रकाशन रामदास भटकळ, पान न. १८५
२.    ! नादब्रम्हातील मंगेशकर,ऑक्टोबर२०००, वर्ष ७ वे,अंक २६ पान न.५२
३.     प्रभाकर जठार, स्वर सौहार्द, पहिली आवृती, पॉप्युलर प्रकाशन रामदास भटकळ, पान न. १८८
४.    ! नादब्रम्हातील मंगेशकर,ऑक्टोबर २०००,वर्ष ७ वे, अंक२६पान न. ५२
५.    कित्ता, पान न. ५३
६.    कित्ता, पान न. ५३
७.    कित्ता, पान न. ५३
८.    वंदना रविंद्र घांगुर्डे, ब्रीद तुझे जगी दीनानाथ, प्रथम आवृती अनुबंध प्रकाशन पान न. ९७ 
९.    प्रभाकर जठार, स्वर सौहार्द, पहिली आवृती, पॉप्युलर प्रकाशन रामदास भटकळ, पान न. १८९ 
  
१०.वंदना रविंद्र घांगुर्डे, ब्रीद तुझे जगी दीनानाथ, प्रथम आवृती अनुबंध     
   प्रकाशन पान न. १५३-१५४ 
  ११. कित्ता, पान न. १५४
  १२. कित्ता, पान न. १५४
  १३. कित्ता, पान न. १५५
  १४. कित्ता, पान न. १५५-१५६
  १५. कित्ता, पान न. १५६
  १६. कित्ता, पान न. १५६
  १७. कित्ता, पान न. १५७
  १८. कित्ता, पान न. १५८-५९
  १९. कित्ता, पान न. १५८
२०  . कित्ता, पान न. १५८-१५९
  २१. ! नादब्रम्हातील मंगेशकर, ऑक्टोबर२०००,वर्ष ७ वे,अंक २६पान न.  
      १२०
  २२. कुमारी लता मंगेशकर, मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृतीदर्शन, प्रकाशिका कुमारी
     लता मंगेशकर पान न. ३ (परिशिष्ट)
  २३.! नादब्रम्हातील मंगेशकर, ऑक्टोबर २०००,वर्ष ७वे, अंक२६पान न.५३
  २४. कित्ता, पान न. १५०
  २५. कित्ता, पान न. १५०
  २६. कित्ता, पान न. १५०-१५१
  २७. कित्ता, पान न. १५४
  २८. कित्ता, पान न. १५४
  २९. कित्ता, पान न. १५४
 ३०. कुमारी लता मंगेशकर , मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृतीदर्शन, कुमारी      लता मंगेशकर  पान न, ३(परिशिष्ट)





प्रकरण 5
मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचे उत्तराधिकारी
१  लता मंगेशकर:-
     नट आणि गायक अशी दुहेरी भूमिका करणारे, नाट्य संगीतात अचाट असे कर्तुत्व करून दाखवणार्‍या दीनानाथ मंगेशकर यांच्या जेष्ठ कन्या लता मंगेशकर,१ यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ ला झाला. या भारताच्या महान गायिका आहेत. हिंदी संगीत विश्वात त्यांना लतादीदी म्हणून ओळखले जाते. लता मंगेशकरांच्या कारकिर्दीची सुरुवात इ.स.१९४२ मध्ये झाली. ही कारकीर्द सहा दशकांपेक्षा अधिक काळ टिकून आहे. लता मंगेशकरांना पहिले संगीताचे धडे आपल्या वडिलांकडून मिळाले. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी वडिलांच्या संगीत नाटकांमध्ये बाल कलाकार म्हणून कामाची सुरुवात केली.
     चित्रपट सृष्टीत इ.स.१९४० च्या दशकात सुरुवातीची कारकीर्द पाहता इ.स.१९४२ मध्ये लता मंगेशकर १३ वर्षाच्या असताना त्यांचे वडील निवर्तले तेव्हा लता मंगेशकरांचे एक आप्त तसेच नवयुग चित्रपट कंपनीचे मालक विनायक ह्यांनी लता दीदीच्या परिवाराची काळजी घेतली. लतादीदिनी गायिका व अभिनेत्री म्हणून कामाचा प्रारंभ केला. २
     मास्टर दीनानाथाचे आयुष्य जेमतेम चार तपांच्या कालखंडाचे असले तरी त्यांनी आपला स्वर वैभवाने रंगभूमीवर नैपुण्य प्राप्त करून रंगभूमीला उजाळा दिला. खांडिलकरांच्या मानापमान या संगीत नाटकातील शुरा मी वंदिले रवि मी प्रेम सेवा शरण भाली चंद्र असे ही पदे तसेच स्वातंत्र्य वीर सावरकरांच्या उर्जस्वल प्रतिभेतून अवतरलेल्या “संन्यास खड्ग नाटकातील शतजन्म शोधताना सुकताची जगी या वीर वामनराव जोशी यांच्या “रंगदुदुभि” मधील परवशता पाश दैवे या सारखी पदे मास्टर दीनानाथांनी तान, फिरत, खटके, मुरके,यातून आपले सारे स्वर वैभव रंगभूमीसाठी अर्पण केले. अशा आपल्या स्वरांची अनमोल ठेव लतादीदीना बोलावून सांगितले की, ते म्हणजे कोपर्‍यातला हा तानपुरा व माझ्या उशाखालची चीजांची वही माझ स्वर वैभव तर तुला भरभरून दिलच आहे. त्यांच बरोबर महत्वाच म्हणजे “तुझ्या गळ्यात गांधार आहे. त्याला जप! माझे सर्वतोपरी आशीर्वाद व मंगेशी कृपा तुझ्यापाठीशी राहिलच आपल्या बाबांचे हे शब्द आशीर्वाद लतादीदीनी सार्थ केला.३
     मास्टर दीनानाथांच्या मते गांधारचा अर्थ शास्त्रीय दृष्टीकोनातून मांडायचा असेल तर आस म्हणता येईल की, तानपुरा जेव्हा पुर्णपणे स्वरांत जुळलेला असतो. तेव्हा खर्जाच्या तारेतून सुसंवादी स्वर उमटतो, कानी येतो त्यालाच गांधार असे म्हणतात, आणि लतादीदीच्या गळ्यातून उमटणारा प्रत्येक स्वर हा परिपूर्णतेची परिसीमा गाठलेला स्वर गांधार लतादीदीनी प्राणपणाने जपला आहे.
     लतादीदीनी गळ्यातील गांधार तर जपलाच त्याप्रमाणे भारतीय संगीतातील स्थूलमानाने कंठसंगीत व वाद्यसंगीत यातील ताळमेळ, दरबारी, वागेश्री रागात कोम गांधार तर भूप देशकार रागात अभिप्रेत असलेला शुध्द गांधार, मियामल्हार गांधार अवरोहाकडे झुकणारा म्हणजे पुर्वांगाकडे झुकणारा तर बहरातील गांधार हा उत्तरांगाकडे म्हणजे आरोहाकडे जाणारा ही गांधाराची रुपे त्या त्या रागापूरती गांधराकडे पाहण्याची वेगवेगळी दृष्टी व तरी आरोह-अवरोहतील रागाचे असणारे निकष यातील सारखेपणा आणि जे जे काही पहिले, ऐकले, वाचले ते आत्मसाद केले. वेगवेगळ्या संगीतकारांची गायकांच्या पिढ्यांतून काहीनकाही शिकण्याचा प्रयत्न केला.
उदाहरणार्थ:-
     नुरजहा सहगल यांच्याकडून गाणे सुरेल उत्कटतेने भावपूर्णतेने कसे म्हणावे, गुलाम हैदरकडून हिंदी भाषेचे उच्चार खाँ साहेब बडे गुलाम अलीकडून गळ्यातील गोडवा, माधुर्य, भरदारपणा, वेदनेच्या हुंकाराने व श्रीमंतीतून भावपूर्ण स्वरांतमांडीत ऐकणार्‍याला पण आर्त करून सोडण्याची किमया अख्तरी बेगमकडून अतिशय गंभीर आर्तपण भरदार व उदात्त स्वरातल गाण खाँसाहेब अमीर खाँकडून, गाण्यातील विविधत, समृद्धता सलमान अलीकडून, निर्दोष ललकारी, सुरेख तान पंडित भीमसेन जोशीकडून अशा संगीतकार गायक यांच्याकडून लतादीदीनी गुणांचे विविध पैलू आत्मसाद केले.४
२  आशा भोसले:-
       मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या व्दितीय कन्या आशा भोसले. ह्या लोकप्रिय गायकी आहेत. भारतीय विविध भाषांत त्यांनी शेकडो गीते गायली आहेत. पण मराठी संगीताला आशा यांच्या गळ्याने दिलेली जोड खूपच अलौकिक आहे. नाच रे मोरा नाच आंब्याच्या वनात मामाच्या गावाला जाऊ याया सारखे अवखळ प्रसन्न बालगीते असे, कुणीतरी बोलवा दाजीबाला, बुगडी माझी सांडली ग सारखी ढंगदार लावणी असो, किंवा ज्ञानदेवांचे भक्तीगीत असो,किंवा का हो धरीला मजवरी राग या सारखी रागदारीने अलंकृत झालेली कोठीवरली लावणी असो अशी प्रत्येक गाणी आशा भोसले यांनी गायिली आहेत.५
     आशा भोसले यांनी हिंदी, मराठी सह अनेक भाषांच्या चित्रपटामध्ये पार्श्वगायन केले आहे. सुरांच्या सहाय्याने केवळ महाराष्ट्रातीलच नव्हेतर भारतातील व जगभरातील लोकमनावर अधिराज्य गाजवणारा आवाज त्या गळ्याला गाता येत नाही असे कुठलेच गाणे नाही.
     आशा भोसले यांनी चित्रपट गायनाची सुरवात माझा बाळ या चित्रपटातून केली १९५० च्या सुमारास त्यांनी हिंदी चित्रपटात ही गाणी गायली पण ते चित्रपट गाजले नाहीत. कारण त्यावेळी हिंदी चित्रपट संगीतावर लता मंगेशकर, रामशाद बेगम, गीता दत्त अशा गायिका राज्य करीत होत्या त्या गायिकांच्या राज्यात राहून स्वता:ला सिध्द करण्याचे आव्हाहन आशाताईन पुढे होते. यादरम्यान त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अडचणी मुलांच्या जबाबदारी प्रतिकूल परिस्थिती या सर्वांशी सामना करत त्यांनी हे आव्हाहन स्वीकारले आणि स्व:बळावर आत्मविश्वासाने पेलले.६
     ! नाद ब्रम्हया अंकातील लेखामध्ये लेखिका कवियत्री शांता शेळके म्हणतात आशा भोसले यांच्या गाण्यात केवळ उच्चारीत शब्द नव्हे तर दोन शब्दांत तिने सोडलेली मोकळी जागा देखील अर्थ गर्भसुचक बनते. मांडगूळकरांची जी गीते गायिली त्यामध्ये भावपूर्ण संवेदनक्षमतेने, रेखीव शब्दौच्चारांनी स्वत:चे असे वेगळे कलात्मक परिणाम परिमाण दिले आहे. माडगूळकरांची गीतरचना, सुधीर फडके यांची स्वररचना आणि आशाने त्याला दिलेली गोड गळ्याची जोड या त्रिवेणी संगमातून मराठी चित्रपटसृष्टीला अनेक रसपूर्ण गीतांचा लाभ झाला आहे.
     विविध प्रकारची गाणी मुजर्‍याची गाणी, कॅबेरेची गाणी, कोठीवरची गाणी, इथपासून शास्त्रीय संगीतावर आधारलेली गाणी इतर भाषतील गाणी गाऊन त्यांनी स्वताची वेगळी गायन पध्दती सिध्द केली आहे.७

३  उषा मंगेशकर:-
     उषा मंगेशकर या उत्तम पार्श्वगायिका, उत्तम चित्रकर्मी आणि कुशल निर्मात्या म्हणून प्रसिध्द आहेत.
     १९४३ साली प्रफुल्ल पिक्चर्स माझ बाळ या चित्रपटात दत्ता डावजेकरांच्या संगीत दिग्दर्शांनखाली सर्व मंगेशकर यांची भावंडे गायली. आणि खर्‍या अर्थाने उषाताई गायला लागल्या त्या १९५३ पासून. मोहीत्यांची मंजुळा’(१९६६), संत निवृत्ती ज्ञानदेव(१९६४-स.सी. रामचंद्र ), साधी मणसं(१९६५-स.आनंदघन ), पावणाकाठचा धोंडी (१९६६ निर्मात्या-उषाताई, स.  हृदयनाथ) सोंगाड्या (१९७१ स. राम कदम), पिंजरा (१९७२-स. राम कदम), आंधळा मारतोय डोळा(१९७३-स.प्रभाकर जोग), पांडू हवालदार(१९७५स. राम लक्ष्मण), सामना(१९७५-स. भास्कर चंदावरकर), झुंझ(१९७५स.राम कदम),, चानी(१९७७ स. हृदयनाथ मंगेशकर), जैत रे जैत (१९७७ स. हृदयनाथ मंगेशकर), जानकी (१९७१-स. हृदयनाथ मंगेशकर) हे अनेक चित्रपटांतले महत्वाचे चित्रपट होते.
     उषा ताईंनी मराठी, हिंदी, बंगली, राजस्थानी, गुजराती, भोजपुरी, आसामी अशा भाषांमधून साडेतीनहजारच्या आसपास गाणी गायली आहेत. उषाताईच्या स्वरांचा साज शब्दांना लावण्य भाहल करणारा आहे. त्यांची प्रतिभा चित्र आणि संगीत या दोन्ही अभिजात कलाक्षेत्रात सहज संचार करण्यासाठी आहे. त्यांच्या गाण्यातील चित्रलिपी आणि चित्रातली स्वरलिपी सारखीच मोहक आहे.
४  मीना मंगेशकर (मीना खडीकर):-
     मीना खडीकर / मंगेशकर याही मराठी हिंदी गायिका आहेत. अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये पार्श्वगायन केले आहे. मुलांची गाणी मराठी गाणी तिच्या रचना त्यांनी केल्या असावा सुंदर चॉकलेट बंगला हे गाण प्रसिध्द आहे. त्याच बरोबर सांग सांग भोळा नाथ हे गाण देखील लोकप्रिय झाले.९
५   हृदयनाथ मंगेशकर:-
हृदयनाथ मंगेशकर ह एक संगीतकार गायक आहेत. हृदयनाथांची संगीत कारकीर्द १९५५ मध्ये सुरू झाली.आकाश गंगा या चित्रपटापासून विविध मराठी चित्रपटांना त्यांनी संगीतबध्द केले आहे. संसार, जानकी, जैत रे जैत, उंबरठा, निवडुंग आणि काही बॉलीवूड चित्रपट आहेत. विनायक दामोदर सावरकर यांच्या कविता व रचना तसेच १९८२ अल्बम ज्ञानेश्वर माऊलीपासून रचना असलेली ज्ञांनेश्वर प्रसिध्द आहेत. हृदयनाथ मंगेशकर हे आधुनिक संगीताचे मानक आहेत. तसेच त्यांची पॉप शैली आहे.१०



तळटीपा
१   नादब्रम्हातील मंगेशकर, ऑक्टोबर २०००, वर्ष ७ वे, अंक २६ पान न.३२ 
   https://en.wikipedia/org./wiki/LataMangeshkar
३   नादब्रम्हातील मंगेशकर, ऑक्टोबर २०००, वर्ष ७ वे, अंक २६ पान न.३२
   कित्ता, पान न. ३३
५   नादब्रम्हातील मंगेशकर, ऑक्टोबर २०००, वर्ष ७ वे, अंक २६ पान न.५५
   https://en.wikipedia/org./wiki/AshaBhosale
७   नादब्रम्हातील मंगेशकर, ऑक्टोबर २०००, वर्ष ७ वे, अंक २६ पान न.५६
   कित्ता, पान न. ४०
   https://en.wikipedia/org./wiki/MeenaKhandikar
१०   https://en.wikipedia/org./wiki/HrudaynathMangeshkar




सारांश

     १९०० साली गोव्यातील मंगेशी गावी दीनानाथांचा जन्म झाला लहानपणी ते फार दृढ होते. म्हणून त्यांच्या आईने ते अवघे ७/८ वर्षाचे असताना त्यांना सारंगी शिकायला सुरूकडे ठेवले. पण त्यांचं गाण आणि गाण्यातला काही जागा ऐकुन त्यांच्या गुरुची खात्री पाटली कि, ह्याचा जन्म वाजवण्यासाठी झाला नसून गाण्यासाठी झाला आहे. आणि ते त्यांना गाण शिकवू लागले. अवघे दहा अकरा वर्षाचे असताना किर्लोस्कर नाटक मंडळीत गेले ताज-ए-वफा हे उर्दूंनाटकरंगभूमीवर आल आणि त्यातलं त्याच गाण आणि अभिनय बघून प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं. “सूंदोपसुंद या नाटकातील रमणी मुदित ठाकलीहे मास्टर दीनानाथांचे पद फार लोकप्रिय झाले या नाटकांच्या जाहिरातीत प्रथम मास्टर दीनानाथ हे नाव झळकले आणि त्या दिवसापासून दीनानाथ मंगेशकर हे महाराष्ट्रात मास्टर दीनानाथ म्हणूनख्यातनाम झाले.
     किर्लोकर कंपनीतच त्यांची आणि राम गणेश गडकरीची ओळख झाली. दीनानाथांना समोर ठेवूनच गडकर्‍यांनी “भावबंधन”मधील लतिका निर्माण केली. त्यांच्या शरीराच्या हालचाली, त्यांचे चंचल डोळे, त्यांचं गाण हे सगळं “लतिका”निर्माण करताना गडकर्‍यांनी मनात ठेवलं कालांतरान किर्लोस्कर नाटक कंपनीत फाटाफुट झाली. आणि दीनानाथांनी बळवंत संगीत मंडळी स्थापन केली. “भावबंधन”या नाटकात त्यांना अमाप किर्ति आणि पैसा मिळवून दिला. हयानंतर मानापमान पुण्याप्रभाव, संन्यस्त खड्ग, ब्रम्हकुमारी अशी एकाहून एक लोकप्रिय नाटक रंगभूमीवर आणून मराठी रंगभूमिवर आपल केवळ अढळ स्थान निर्माण केले. पुण्याप्रभाव मधील कालिंदी, राजसंन्यास मधील शिवांगी या भूमिका विशेष गाजल्या. उग्रमंगल नाटकात छोडो छोडो बिहारी या ठुंबरीवर ते नृत्य करीत हा ठुंबरी नाच हे त्या काळातील आकर्षण ठरले. मानापमानातील धैर्यधर ब्रम्हकुमारीतील तपोधन इत्यादी पुरुष भूमिकाही केल्या पण ध्येयवादी आक्रमक, स्वतंत्र बाण्याच्या त्यांच्या स्त्री भूमिका खूप गाजल्या. लोकमान्य टिळकांनी पुण्याप्रभावाचा प्रयोग केला होता. दीनानाथांच्या बळवंत मंडळीने महाराष्ट्र भर फिरत राहून नाट्यसंगीत गावोगाव पोहोचविले. आफ्रिकेचा दौरा आखला आणि हिंदी नाटकांची गुजराती रुपे करून बसविली. गोमंतकात या गायक नटाला कोल्हटकरांनी मास्टर हे हेडपद लावले.
     कालांतरान चित्रपटाचा जमाना आला आणि नाटक कंपन्यांना हादरा बसला दीनानाथांनी बळवंत सिनेटोन ही चित्रपट कंपनी काढून “कृष्णार्जुन युध्द” हा चित्रपट निर्माण केला, दुर्दैवान त्यांना चित्रपट निर्मितीत यश आल नाही. आणि त्यातूनच त्यांच्यावर भरलेले खटले आणि तीव्र मनस्ताप झाला ह्याला त्यांना काही वर्ष तोंड द्यावं लागलं
     ह्या अपयशाचा तडाखा बसून त्यांची प्रकृती ढासळली अखेरीस पुण्यात त्यांचा शोकजनक अंत झाला. त्यावेळी ते अवघे बेचाळीस वर्षाचे होते. मरेपर्यंत त्यांचा संगीताचा रियाज अखंड चालू होता.
     दीनानाथ मंगेशकर यांनी नाटकमध्ये जास्त कालावधी काम केल त्यामुळे नाट्यसंगीताकडे लक्ष देता आले नाही. त्याच प्रमाणे त्यांचा शिष्य परिवार कमी आहे. आणि जो आहे. तो कमी होत आहे. त्यामुळे त्यांच्या नाट्यसंगीताची माहिती कमी प्रमाणात मिळते.
     प्रस्तुत प्रबंधामध्ये पाहता पहिल्या प्रकरणामध्ये विसाव्या शतकातील महाराष्ट्रातील नाट्यसंगीताचा परिचय करून दिला आहे. यामध्ये नाट्यसंगीताचा इतिहास , नाटकाची वाढ विकास, किर्लोस्कर देवलयुग गंधर्वयुग,कोल्हटकरपर्व यातून संगीत नाटकांची झालेली सुरुवात आणि वाढ याची माहिती सांगितली आहे. दुसर्‍या प्रकरणात मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचे जीवन परिचय त्यांचे बालपण, गायन, वादन, नृत्य याचे शिक्षण, किर्लोस्कर नाटकमंडळीत झालेले पदार्पण याबदलमाहिती आहे. तिसर्‍या प्रकरणात मास्टर दीनानाथांनी नाटकात कोणती कामगिरी केली त्याचप्रमाणे नाटकात त्यांनी स्त्री-पुरुष भूमिका केल्या त्याही खुप गाजल्या याबद्दलची माहिती चौथ्या प्रकानात संगीत क्षेत्रात केलेली कामगिरी नाट्य आणि संगीत याचा घातलेला ताळमेळ यांची माहीत तर पाचव्या प्रकारणात मास्टर दीनानाथाचे वारस यांची माहिती दिली आहे.



निष्कर्ष
मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या नाट्यसंगीत याविषयावरील संशोधांनामुळे मास्टर दीनानाथांच्या कार्याची ओळख झाली त्याचप्रमाणे नाट्यसंस्कृती तसेच नाट्यसंगीत यांचा जवळून परिचय झाला. तसेच या संशोधनाचा फायदा शिक्षकांना व विद्यार्थ्यांना होईल, आणि दीनानाथांच्या नाट्यसंगीतातील दिलेल्या योगदांनाबदल ओळख होईल, आणि आणखीन संशोधन करणायची आवड निर्माण होईल.


 संदर्भसूची

                कानडे मु.श्री. नाट्य-शोध , निहारा प्रकाशन प्रथमावृत्ती १९८७
                काळे, के, नारायण, कुलकर्णी, वा.ल., ढवळे,वा.रा. अमृत नारायण,  
     भालेराव स्मृतिग्रंथ मराठी रंगभूमि मराठी नाटक प्रथमावृत्ती १९७१
                कुलकर्णी प. श्यामराव (धर्म) ग्वाल्हेर धराण रागविद्येची गंगोत्री
     राजहंस प्रकाशन पुणे. प्रथमावृत्ती जुलै २००३
                खांबेकर सूर्यकांत, स्वरसुधा स्नेहा प्रकाशन पुणे.
                घांगुर्डे, वंदना रविंद्र, ब्रीद तुझे जगी दीनानाथ अनुबंध प्रकाशन पुणे,  
      पहिली आवृत्ती ६ एप्रिल २००६
                चवरे रेखा हे रत्न भारताचे लता मंगेशकर परचुरे प्रकाशन मुंबई पहिली
     आवृत्ती १९९०/१९९२
                जठार प्रभाकर, दिना दिसे मज दिन रजनी पॉप्युलर प्रकाशन मुंबई      पहिली आवृत्ती १९९०/१९९२
                जठार प्रभाकर, स्वर सौहार्द पॉप्युलर प्रकाशन मुंबई पहिली आवृत्ती      १९९५
                जोशी गो.रा. शतजन्म शोधितांना श्री विद्या प्रकाशन आवृत्ती वर्ष      २००८
१०            डहाळे संजय, किस्से रंगकर्मीचे अमोद प्रकाशन मुंबई
११            देसाई वसंत, शांताराम किर्लोस्कर आणि देवल, सौमैया पब्लिकेशन,      प्रा.लि.१७१ मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय मार्ग दादर प्रथमावृत्ती
१२            धोंडो मधुकर वासुदेव , प्रबंध ध्रुपद आणि ख्याल मराठी संशोधन      मंडळ प्रकाशन मुंबई १९७५
१३            पै शिरीष (माई मंगेशकर/ शब्दांकन) स्वरांच्या सावलीत परचुरे प्रकाशन, गिरगाव मुंबई पहिली आवृत्ती २४/४/१९८७
१४            पोतदार अनुराधा, महान स्त्रिया परिप्रकाशन २९ ऑगस्ट २०१३
१५            बेडेकर विश्राम एक झाड आणि दोन पक्षी पॉप्युलर प्रकाशन मुंबई      पहिली आवृत्ती१९८४/१९०६/सहावे पुन्हमुर्द्रण२०१२/१९३४
१६            भवाळकर तारा, मराठी नाट्य परंपरा शोध आणि आस्वाद मेहता      पब्लिकेशन हाऊस १२१६ सदाशिवपेठ प्रथमावृत्ती १९९५
१७            भिमानी हरिष (मराठी अनुवाद अशोक जैन) सप्तसुरांच्या पलीकडे लता      मंगेशकर अनुबंध प्रकाशन पुणे, प्रथमावृत्ती १९९५ व्दितीय आवृत्ती      २००८
१८            मंगेशकर लता, फुले वेचिता, मैत्रेय , प्रकाशन २०१४
१९            लता मंगेशकर, मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृतिदर्शन प्रकाशिका      कुमारी लता मंगेशकर मुंबई
२०            वर्दे मोहिनी संप्तक डिंपल पब्लिकेशन ३० जानेवारी २००२
२१            शिंदे विश्वनाथ, हिमांशू स्मार्त, मराठी नाटक आणि रंगभूमी प्रतिमा      प्रकाशन, पुणे ३०. प्रथमावृत्ती मार्च २००८
२२            शेळके, लिमये, वैद्य, लता प्रकाशन शांताशेळके लता मंगेशकर महोत्सव मुंबई पहिली आवृत्ती १९६७
२३            सरदेसाई माया, भारतीय रंगभूमीची परंपरा, स्नेहवर्धन प्रकाशन पुणे
२४            सामंत बाळ, शुरा मी वंदिले परचुरे प्रकाशन गिरगाव मुंबई पहिली      आवृत्ती ४ मे २०००
२५            लेले य.ग. मराठी रंगभूमीचा इतिहास खंड – १ भाग १ यक्षगान      भागवत नाटक
२६            तर्क तीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी मराठी विश्वकोश खंड ८ महाराष्ट्र      राज्य साहित्य संस्कृती मंडळ
२७            नादब्रम्हातील मंगेशर ऑक्टोबर २००० वर्ष ७ वे अंक २६ संपादिका      माधवी नानल, संस्थापक वैद्य रमेश नानल
२८            रुची ग्रंथली वाचक दिन विशेषांक ८४  संपादन वासंती मुजुमदार      ग्रंथली वाचक चळवळ अंक पहिला मनाचे वेड प्रभाकर जठार
२९            मोशाय बाबू मंगेशकर दि संगीतातील नेपोलियन लोकराज्य ५३:१:२२      फेब्रुवारी २०००
३०            बहुलेकर शिल्पा, मास्टर दीनानाथ एक अनोखे सांगितीक व्यक्तिमत्व       ऊ नाद ब्रम्ह २०००
३१            जोशी सुनील जगन्नाथ, मास्टर दीनानाथ: एक झपाटलेला स्वायभू      गायक कलावंत तरुण भारत २४ डिसेंबर २०००




कॉलेजचे नाव   : एल.जे.एन.जे. महिला विद्यालय विलेपार्ले पूर्व
युनिर्वसिटी     : श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी वुमन                     युनिर्वर्सिटी
नाव          : गायकवाड सूचिता गोपाळ
पत्ता         : राम निवास चाळ,गणेश मित्र मंडळ,
               देवीपाडा,बोरीवली (पूर्व) मुंबई न. ४०००६६
पात्रता        : एम. ए II
विषय         : इतिहास (मराठी माध्यम)
संशोधनाचे नाव : मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचे महाराष्ट्रातील                    नाट्यसंगीत कार्यातील योगदान 
शैक्षणिक पात्रता :

सन-वर्ष २०१७-२०१८

मार्गदर्शक शिक्षक:- डॉ. प्रो.ईला वेद मॅडम
   
डिपार्टमेंट:-
                              प्रिन्सिपल मॅडम








उदिष्ट्ये
१.    २०व्या शतकातील नाट्यसंस्कृतीची माहिती व्हावी.
२.    मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचे नाट्यसंगीत मधील योगदान
३.    मंगेशकर कुंटुंबाचे नाट्यसंगीत ते चित्रपट संगीत हयामध्ये झाले वाटचालीचा परिचय व्हावा.
४.    नाट्यसंगीतातून समाजात घडणार्‍या घडामोडीची कशाप्रकारे ओळखकरून दिली आहे आणि इतिहासाची करून दिलेली ओळख एतिहासिक ठेवा कशाप्रकारे जतन करून ठेवला आहे याची ओळख व्हावी.
५.    मराठी नाट्य आणि संगीत यांच्या उद्याची माहिती व्हावी.
६.    मराठी समाजातील सामाजिक आणि संस्कृतिक परिस्थिती याची नाट्य संगीतातून माहिती मिळावी





प्रस्तावना

     विसाव्या शतकात महाराष्ट्रात जी काही वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्व निर्माण झाले त्यापैकी एक व्यक्तिमत्व म्हणजेच मास्टर दीनानाथ मंगेशकर . नाटक आणि नाट्यसंस्कृतीम संगीत, रंगभूमि यामध्ये मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचे योगदान खूपच मोलाचे आहे. मास्टर दीनानाथ मंगेशकरहे मराठी गायक, नाट्य अभिनेते, संगीतकार होते. त्याच प्रमाणे हे सर्व असतानाच ते एक उत्तम ज्योतीशी होते.
     त्याचप्रमाणे अव्दितीय गळा, अस्खलित वाणी, तल्लख बुध्दी हे उपजत गुण त्यांच्या अंगी होते. निकोप प्रसन्न चढासूर भिंगरीसारखी फिरणारी तान आणि पक्की स्वरस्थाने ही देवाने दिलेली देणगी होती हे सर्व पैलू मास्टर दीनानाथाकडे होते. यासर्व गुणामुळे व मंत्रोच्चार वेद यामध्ये असणारी आवड ह नाटक लक्षपूर्वक पाहून छोट्या बाळनटाच्या भूमिका करता करता त्यांची नाट्यसंगीताकडे झालेली वाटचाल खूप मौलिक आहे.
     पूर्वी पौराणिक नाटकांची सुरुवात झाली. पौराणिक नाट्यमांडळ्या
व आर्योव्दारक सारख्या गद्य नाटक मांडळ्या रसिकांचे रंजन करीत. त्यानंतर संगीत नाटक मांडळ्या उदयास आल्या. त्यावेळी दीनानाथांनी नाटकातील प्रत्येक भूमिका चांगल्या प्रकारे केली. पूर्वी नाटकात स्त्री काम करत नसत त्यामुळे स्त्री भूमिका ही ते करत असत आणि पुरुष भूमिकाही करत आणि या सर्व भूमिका कसोसीने करत असत. अशा प्रकारे त्यांनी नाट्यसंगीत यामध्ये आपला ठसा उमटवला आणि त्यांचे उत्तरदायित्व असणारे मंगेशकर कुंटुंबीय म्हणजेच त्यांची मुले लता मंगेशकर, उषा मंगेशकर, आशा भोसले, मीना मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर यांनीही गायन, संगीतकार, या मध्ये आपले नाव लौकिक मिळवले.
     त्यामुळे दीनानाथ मंगेशकरांनी नाट्यसंगीत यामध्ये कशाप्रकारे योगदान दिले आणि त्यांचे यातील कार्य किती मौलिक आहे याची ओळख व्हावी.


  
४ विषयाचे नाव:- मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचे नाट्यसंगीतातील योगदान
४.१ संगीत नाटकातील परंपरा
     संगीत नाटकाची परंपरा विष्णुदास भावे यांच्या स्वयंवर १८४३ मधील या नाटकापासून सुरू झाली. १८४३ व १८५५ दरम्यान मराठी नाटक कंपन्या पौराणिक नाटके व नाटक कंपन्या यांनी नाट्य रसिकांचा पाहुणचार केला.
४.२ २०व्या शतकतील महाराष्ट्रातील नाट्यसंस्कृतीचा परिचय
     १८८० मध्ये अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या संगीत शाकुंतल यांनी सादरीकरण करताना मराठी संगीत नाटकांची सुरुवात केली. त्यामुळे मराठी संगीत नाटकांच्या इतिहासात किर्लोस्कर संगीत नाटकांचे पंडित म्हणून ओळखले जातात.त्यानंतरच्या काळात गोविंदराव टेंबे, बालगंधर्व, छोटा गंधर्व, वसंतराव देशपांडे आणि मास्टर दीनानाथ मंगेशकर जयमाला शिलेदार हे संगीत नाटकात प्रख्यात होते.




५ मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचे व्यक्तिमत्व
५.१ मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचे बालपण
     मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचा जन्म २९ डिसेंबर १९०० मध्ये गोमांतकालीन मंगेशी येथे झाला. त्याच प्रमाणे ज्या वातावरणात त्यांचा जन्म झाला ते वातावरण हे धार्मिक होते. आणि त्यांच्या अंगी असणारे उपजत गुण यामुळे त्यांची जडणघडण झाली ह्यामध्ये त्यांच्या आईचा मोलाचा वाटा आहे.
५.२संगीताचे शिक्षण
     तल्लख बुध्दी, पक्की स्वरस्थाने यासाठी देवाने त्यांना दिलेली होती. बाबा (रघुनाथ मामा) माशेलकर हे त्यांचे पाहिले गाण गुरु होते. त्यानंतर रामकृष्ण वझे, गणपती बुवा भिलवडीकर, भाटेबुवा निसार याकडून त्यांनी गाण मिळवल.
५.३ नाटक किंवा नाट्यसृष्टीतील कारकीर्दमध्ये प्रवेश करताना पूर्वीचे लहानपणी मिळवलेला नावलौकिक.
     मास्टर दीनानाथ यांनी संगीत नाटकाच्यामध्ये खूप रस असल्यामुळे नाटकाचे निरीक्षण करून हुबेहूब भिमिका करत यामुळे अवघ्या १४व्या वर्षात त्याच नाव लौकिक झाला आणि किर्लोस्कर नाटक मंडळीमध्ये पदार्पण झाले.

६  नाटक नाट्यसृष्टीतील कारकीर्द:-
६.१ मास्टर दीनानाथ मंगेशकर यांची अभिनय असलेले नाटक
     I उग्रमंगल मध्ये पदयावती (पदयावती)
     II एकचप्यालामध्ये (सिंधू)
     III भक्त प्रल्हाद (दुय्यम स्त्रीची भूमिका)
     IV गैरसमज (सदानंद) ही मास्टर दीनानाथ यांची अभिनय असलेली          नाटक आहेत.
६. २ मास्टर दीनानाथांचे संगीत असलेली नाटके
     I ब्रम्हकुमारी
          संन्यस्त खडग यामध्ये त्यांची ही संगीत नाटके आहेत.
६.३ दीनानाथ मंगेशकर बळवंत पिक्चर्स बनवलेले हिंदी-मराठी चित्रपट
     I अंधेरी दुनिया
     II कृष्णार्जुन युध्द
     III भक्त पुंडलिक

६.४ मास्टर दीनानाथाचे लेखन
     मास्टर दीनानाथ हे उत्तम ज्योतिषी होते. त्यामुळे राग-रागिन्यांचे वर्णन स्वरांचा रंगावरून त्यांचा निसर्गातील-सूर्य किरणातील रंगाचा वेळेशी कसा संबंध लागते हे आणि म्हणून अमुक वेळेला अमुक राग गाणे ही कल्पना सिध्द होते. हे लेखन केले परंतु प्रसिध्द होण्यापूर्वी ते गहाळ झाले.




दीनानाथ मंगेशकर यांचे उत्तराधिकारी / वारस
१ लता मंगेशकर
     यांचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ ला झाला. त्या एक महान गायिका आहेत. हिंदी गीते आणि प्रादेशिक भाषेतही त्यांनी गाणी गायली. वयाच्या ५व्या वर्षापासून त्यांनी संगीत नाटकांमध्ये बाळकलाकार म्हणून काम केले.
२ उषा मंगेशकर
     त्या एक गायिका आहेत. भारतीय शास्त्रीय संगीत, पार्श्वगायन ही त्यांच्या गायनाची शैली आहे.
३ आशा भोसले
     या लोकप्रिय गायक आहेत. वैयक्तिक आयुष्यात अनेक अडचणी आल्या असल्यामुळे त्यावर मात करून आव्हाहण स्वीकारले आणि समर्थपणे पेलले.
४ मीना मंगेशकर / खडीकर
     या मराठी हिंदी गायिका आहेत. मराठी हिंदी चित्रपटात पार्श्वगायन असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, सांग सांग भोळनाथ ही गाणी प्रसिध्द आहेत.
५ हृदयनाथ मंगेशकर :-
     हृदयनाथ मंगेशकर हे भारतातील एक संगीतकार आणि गायक आहेत. विविध मराठी चित्रपट त्यांनी संगीत बध्द केले. त्यांच्या गायनाची शैली ही पॉप संगीत शैली आहे.




संशोधन पद्धती:- संशोधनात लायब्ररी वर्क चा उपयोग केला आहे.
संशोधन व्याप्ती:-
     सादर संशोधन मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या नाट्यसंगीतात योगदान यावर मर्यादित आहे. आणि यामध्ये मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या बद्दल अभ्यास करण्यात आला आहे.
शैक्षणिक महत्व:-
     सदर संशोधना अंत मिळणार्‍या निष्कर्षाचा फायदा विद्यार्थी यांना होणार आहे. प्रस्तुत संशोधनातून मास्टर दीनानाथ मंगेशकर यांनी नाट्यसंगीतात दिलेल्या योगदानाबद्दल  ओळख होईल.
निष्कर्ष :-
     या संशोधांनामुळे मास्टर दीनानाथांच्या कार्याची ओळख झाली नाट्यसंस्कृतीचा व नाट्यसंगीताचा यामुळे जवळून परिचय झाला.
सारांश:-
     अशाप्रकारे मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचे नाट्यसंगीतात योगदान यावर संशोधन करण्यात आले. व आणखी संशोधन करण्याची आवड निर्माण झाली.

Comments